Join us

Vegetable Market : बाजारात भाजीपाला कडाडला, शेतकऱ्यांना दिलासा कुठे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:51 IST

Vegetable Market : एकीकडे पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामाची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे भाजीपाल्याच्या बाजारात दर कडाडले आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले असले, तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र नुसतेच नुकसान पडत आहे. वाचा सविस्तर (Vegetable Market)

Vegetable Market : एकीकडे पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामाची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे भाजीपाल्याच्या बाजारात दर कडाडले आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले असले, तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र नुसतेच नुकसान पडत आहे.(Vegetable Market)

पावसामुळे शेतातच भाजी सडत असून, बाजारात पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले आहेत. पण शेतकरी मात्र चिखल, खराब पीक आणि खर्चाच्या ओझ्याखाली भरडला जात आहे. त्यामुळे भाव वाढले, पण नफा नाही ही शेतकऱ्यांची वेदना अधिक तीव्र होत आहे.(Vegetable Market)

मागील २२ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात सतत बदलत्या हवामानामुळे कधी ढगाळ वातावरण, तर कधी मुसळधार पावसाचा सामना नागरिक करत आहेत.(Vegetable Market)

काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे खरीपपूर्व कामे थांबली आहेत. दुसरीकडे, भाजी मंडईत फळभाज्या व पालेभाज्यांचे दर चढे असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाहीये. पावसामुळे शेतातच भाजीपाला खराब होत असल्याने बळीराजा आर्थिकदृष्ट्या अधिक अडचणीत सापडला आहे.(Vegetable Market)

पालेभाज्यांमध्ये किंचित दरवाढ, परंतु नफा नाही

पालेभाज्यांमध्ये ५ रुपये प्रति जुडी एवढी किंचित दरवाढ दिसून आली आहे. मेथी १५ रुपयांवरून २० रुपयांना, पालक, शेपू, चुका, तांदुळजा, करडई यांसारख्या भाज्या १०-१२ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

पावसामुळे या भाज्यांचे उत्पादन कमी झाले आणि शेतकरी शेतात भाजी काढण्यासाठी जाऊ शकत नाहीत. परिणामी बाजारातील पुरवठा घटल्याने किंमतीत वाढ झाली असली तरी शेतात सडणाऱ्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना तोटाच होत आहे.

फळभाज्यांचे दर गगनाला भिडले

टोमॅटो, भेंडी, चवळी, शिमला मिरची, पत्ताकोबी यांसारख्या फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २० रुपयांना मिळणारे टोमॅटो ५० रुपयांवर गेले आहेत. पत्ताकोबी ४० वरून ६० रुपये, भेंडी ८० रुपये, शिमला मिरची व शेवग्याच्या शेंगा सुद्धा ८० रुपये प्रति किलोने विकली जात आहेत. अद्रकचा दर २० वरून थेट ६० रुपयांवर पोहोचला आहे.

बिन्सचे भाव मात्र घसरले

मार्च-एप्रिलमध्ये २०० ते २५० रुपये किलोने विकले जाणारे बिन्स, मागील १५ दिवसांत आवक वाढल्याने केवळ ८० रुपये किलोवर आले आहेत. लिंबू सुद्धा १२० वरून ६० ते ८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. गवारचे दरही ४० रुपयांनी घसरून ८० रुपये किलो झाले आहेत.

शेतकऱ्यांवर ताण

पावसामुळे जमिनीत चिखल झाला असून, शेतात जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला शेतातच सडत आहे. बाजारात दर वाढले असले, तरी विक्रीसाठी माल आणता न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

पावसामुळे भाजीपाला शेतातच खराब होतोय. आम्ही त्याला बाजारात आणू शकत नाही. दर वाढले असले तरी उत्पादन सडल्याने आमचा खिसा रिकामाच राहतो आहे. - अविनाश दांडगे, शेतकरी.

भाजीपाला बाजारात महागला असला तरी, शेतात सडलेला माल, वाढलेला खर्च, व बाजारात पोहोचवण्यातील अडथळे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यात पाऊस आला, भाजीपाला महागला, पण शेतकऱ्याचा खिसा रिकामाच राहिला, हे चित्र दिसून येत आहे.

पालेभाज्यांचे भाव (जुडी दरात)

प्रकारदर (प्रति जुडी)
मेथी२०
पालक१५
शेपू१५
चुका१५
तांदुळजा१५
करडई१५

फळभाज्यांचे भाव (प्रति किलो)

प्रकारदर (प्रति किलो)
टोमॅटो५०
पत्ताकोबी६०
भेंडी८०
चवळी८०
वांगी४०
शिमला मिरची८०

हे ही वाचा सविस्तर : Marathawada Rain Update : २५ वर्षांतील विक्रम मोडला: मराठवाड्यात विक्रमी 'मे'मधील पाऊस वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रभाज्याबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती