बालय्या स्वामी
वादळी वाऱ्यांनी बागांचे नुकसान आणि बाजारात प्रचंड भावघसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडले आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून उभारी घेतलेली पपई आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे. (Papaya Market)
७०-८० हजार रुपये प्रति एकर खर्च करूनही शेतकऱ्यांना फक्त ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळतोय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची तातडीने गरज आहे.(Papaya Market)
अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची पाठ सोडायला संकटे तयार नाहीत. याचा प्रत्यय पपई उत्पादक शेतकऱ्यांना येत आहे. (Papaya Market)
मे महिन्यात वादळीवाऱ्याने झालेल्या नुकसानीतून सावरत असतानाच आता पपईच्या दरात झालेली प्रचंड घसरण शेतकऱ्यांसाठी नव्या चिंतेचे कारण बनली आहे.
सद्यःस्थितीत पपईचा उत्पादन खर्चही निघेल की नाही? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
कौठा आणि परिसरातील शेतकरी मागील काही वर्षापासून पपई पिकाकडे नगदी पीक म्हणून आकर्षित झाले होते. सुरुवातीला १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळाल्याने पपईचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले होते. त्यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात पपईची लागवड झाली.
परंतु मागील काही दिवसांपूर्वी कौठा, बोराळा, महम्मदपूरवाडी, पिंप्राळा, खुदनापूर, बोरगाव, किन्होळा आदी परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. केळी पिकासह पपईच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक पपईचे मळे पूर्णपणे आडवे झाले.
झाडे मोडून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. नैसर्गिक आपत्तीतून कसेबसे सावरत असतानाच आता वाचलेल्या पपई पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी
पपईचे पीक मोठा आधार देईल असे वाटत असतानाच अर्धा मळा वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाला. आता काही झाडे शिल्लक असताना व्यापाऱ्यांकडून अगदी ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल भाव येत असल्याने मोठी अडचण येत आहे.
अगोदर नैसर्गिक आपत्ती आणि आता भावाची घसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पपई उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पण बाजारात कवडीमोल भाव!
यंदा पपईला भरघोस उत्पादन होईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी एकरी ७०-८० हजार रुपये खर्च करून पपईची लागवड केली होती. पण सध्या बाजारात फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल, म्हणजेच ३ ते ४ रुपये प्रति किलो इतकाच भाव मिळत आहे.
वादळी वाऱ्याने खूप झाडे मोडून गेली. उर्वरित झाडांची फळे तोडणी सुरू असून, भाव मात्र फक्त प्रति किलो ३ ते ४ रुपये मिळत असल्याने उत्पादन खर्च तरी कसा फिटणार? ही चिंता लागली आहे. आधी अवकाळी पावसाने नुकसान झाले. आता बाजारात भाव मिळत नसल्याने पपई उत्पादनात फटका सहन करावा लागत आहे.- राजू खराटे, शेतकरी
सध्या केवळ ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दराने पपई विकली जात आहे. म्हणजेच प्रति किलो फक्त ३ ते ४ रुपये या दरातून उत्पादन खर्च सोडाच काढणीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. चांगले उत्पादन होईल, या आशेवर एक एकरवर पपईची लागवड केली होती. - पंडित खराटे, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Bajar Samiti : धान्य घटलं, भाज्या वाढल्या; 'या' कृषी बाजार समितीचा चेहराच बदलला