लासलगाव : मागील वर्षी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कांदा खरेदीचा (Kanda Kharedi) घोळ बघता यंदा केंद्र सरकारने त्यांना बाजूला करत नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन म्हणजेच एनसीसीएफ या संस्थांकडून कांदा खरेदी केली जाणार असल्याची घोषणा केली.
यावर्षीही ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे (Onion Procurement) उद्दिष्ट ठेवण्यात आले अन् एप्रिलच्या अखेरीस निविदा प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी अद्याप प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमात असून, शासकीय खरेदी प्रक्रियेच्या धिम्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
एकीकडे अवकाळी पावसाने (Avkali Paus) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर सध्या कांद्याला मिळणारे दर आणि झालेला खर्च बघता ताळमेळ बसत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. यंदा केवळ नाशिक जिल्ह्यातून नाफेड आणि एनसीसीएफकडून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. एनसीसीएफने खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने योजना आखली होती. मात्र, निविदा प्रक्रिया पार पडून तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटूनही प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात झालेली नाही.
शेतकऱ्यांना पुन्हा पहिलाच अनुभवमागील वर्षी कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये अनेक तक्रारी व अनियमितता समोर आल्याने यंदा कारभार अधिक पारदर्शक आणि वेळेवर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता तोच जुना अनुभव पुन्हा घडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
कांदा खरेदी लवकर सुरू होण्याची प्रतीक्षाबाजारात कांद्याचे दर घसरले असून, पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याचे नुकसान होत आहे. साठवणूक योग्य वेळी न झाल्यास कांदा खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून खरेदी लवकर सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याला किमान ५५१ रुपये, कमाल १५७० तर सरासरी ११७५ रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे.
एप्रिलमध्ये निविदा होऊन मे संपत आला, तरी खरेदीला सुरुवात झालेली नाही. हे प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. कांदा हातात असताना शेतकऱ्यांची नजर अजूनही सरकारी खरेदीच्या वाटेकडे, ही परिस्थितीच दुर्दैवी आहे. खरेदी प्रक्रीयेत पारदर्शकता यावी अशी अपेक्षा असतांना शेतकऱ्यांना मात्र अजूनही खरेदीची वाट पाहावी लागत आहे.- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना.