Kanda Market Update : वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील शेतकरी कांद्याच्या घसरत्या दरामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.बाजारात कांद्याला सध्या फक्त ९०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळत आहे. (Kanda Market Update)
लागवडीसाठीचा खर्च प्रतिक्विंटलमागे तब्बल १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपये आला आहे.परिणामी, शेतकऱ्यांना दर क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. दर घसरल्यामुळे आणि खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.(Kanda Market Update)
३५ गावांतील शेतकरी संकटात
शिऊर व परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये या हंगामात सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे.
दरवर्षी कांद्याला चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी लागवड वाढवली. मात्र, सध्या मिळणारा भाव खर्चापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दुहेरी नुकसान
या हंगामात आम्ही जवळपास ५०० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले. चांगल्या दराच्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला; पण त्यातील जवळपास ५० टक्के कांदा सडून गेला. उर्वरित कांदा टिकवणे देखील आव्हान ठरत आहे. बाजारभाव नसल्याने आणि माल खराब झाल्याने आम्हाला दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे.- नवनाथ आढाव, शेतकरी
हमीभावाची मागणी
शासनाने कांद्याला तातडीने हमीभाव द्यावा. निर्यातीस चालना देण्यासाठी सबसिडी व प्रोत्साहन योजना लागू कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासावर आणि अर्थकारणावर गंभीर परिणाम होईल.- राजू पाटील चिकटगावकर, शेतकरी
कांद्याची लागवड व विक्री टप्प्याटप्प्याने करणे शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. कांदा चांगल्या पद्धतीने चाळीत साठवावा आणि बाजारात योग्य वेळेची निवड करून विक्री करावी. यामुळे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते.- श्याम पाटील, कृषी मंडळाधिकारी