Join us

Halad Market : हळदीचा दर गडगडला; शेतकऱ्यांचा 'नफा' व्यापाऱ्यांकडे गेला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:40 IST

Halad Market : यंदा पावसाने दिलासा दिला, पण बाजाराने दगा दिला. वाशिमसह विदर्भात हळदीची आवक वाढताच दरात विक्रमी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आशा मातीमोल ठरत असताना, व्यापाऱ्यांनी हळदीची साठवणूक सुरू केली आहे. दरातील फरक पाहता, एकीकडे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. (Halad Market)

Halad Market :  यंदा पावसाने दिलासा दिला, पण बाजाराने दगा दिला. वाशिमसह विदर्भात हळदीची आवक वाढताच दरात विक्रमी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आशा मातीमोल ठरत असताना, व्यापाऱ्यांनी हळदीची साठवणूक सुरू केली आहे. (Halad Market)

दरातील फरक पाहता, एकीकडे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची चांदी होत आहे. खरीप हंगामाची सुरुवात पावसाच्या दिलासादायक आगमनामुळे समाधानकारक झाली असली, तरी बाजारातील अस्थिरतेने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. (Halad Market)

यंदा हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परिणामी, मागील दोन महिन्यांच्या तुलनेत दरात प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार १५० रुपयांची घसरण झाली आहे.(Halad Market)

हळदीच्या बाजारातील घसरण शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत असून, यावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा, हळद ही नगदी पीक म्हणून टिकून राहणार नाही आणि देशातील उत्पादन साखळीवर त्याचे परिणाम होणार हे नक्की.(Halad Market)

सोयाबीनमधून हळदकडे वळले, पण...

गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने अमरावती विभागातील अनेक शेतकऱ्यांनी हळद हे नगदी पीक म्हणून निवडले. 

यंदा वाशिम जिल्ह्यात हळदीचे लागवड क्षेत्र वाढले असून उत्पादनही अधिक झाले आहे. त्यामुळे बाजारात पुरवठा वाढला असून, त्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे.

वाशिम बाजारात मोठी आवक, दर मात्र घसरले

गेल्या शुक्रवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ६ हजार ५०० क्विंटल हळदीची नोंद झाली. मात्र, या दिवशी हळदीचे दर १० हजार ८५० ते १२ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतकेच राहिले. याआधी फेब्रुवारी-मार्चमध्ये हाच दर १३ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला होता.

कृषितज्ज्ञांचे मत

हळदीचे दर पुरवठा आणि मागणी यावर अवलंबून असतात. यंदा उत्पादन अधिक असल्याने दर कमी झाले आहेत. शासनाने साठवणूक केंद्र, बाजार हस्तक्षेप योजना, व सेंद्रिय हळदीसाठी प्रोत्साहन अशा माध्यमातून शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. - रवी मारशेटवार, कृषितज्ज्ञ 

शेतकऱ्यांच्या आशा उधळल्या; व्यापाऱ्यांना साठवणुकीचा फायदा !

शेतात मेहनत घेऊन जे पीक घेतले, त्याचे दर इतके कमी मिळतात की खर्चही निघत नाही. व्यापारी मात्र स्वस्तात हळद खरेदी करून साठवणूक करतात. काही महिन्यांनी दर वाढल्यावर त्यांचाच फायदा होतो. - कैलास गावंडे, शेतकरी (शिरपूर) 

व्यापारी वर्गाने यंदा सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर खरेदी करून गोदामात हळद साठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारातील वास्तविक मागणीपेक्षा पुरवठा अधिक भासवले जात आहे, अशी शंका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

'सरकारने हमीभाव द्यावा' - शेतकऱ्यांची मागणी

हळद उत्पादक शेतकरी व संघटनांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेचे नेते दामूअण्णा इंगोले म्हणाले, जर सरकारने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात शेतकरी हळद लागवड टाळू शकतात. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनावरही परिणाम होईल.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Bajar Samiti : सोयाबीन, हळद माल शिल्लकच; भाववाढीची शाश्वती मिळेना करायचे तरी काय?

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड