Banana Export : खाडी देशांतील युद्धाच्या सावटाखाली अर्धापूरच्या शेतकऱ्यांचे भवितव्य ढासळले आहे. वादळी वाऱ्याच्या नुकसानीतून सावरतानाच आता केळीची निर्यात ठप्प झाली आणि दरात मोठी घसरण झाली. एका मागोमाग आलेल्या संकटांनी शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत.(Banana Export)
खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्षाचे पडसाद आता केळीवर उमटू लागले आहेत. इराण, सौदी अरेबिया, युएई, कुवेत, कतार, बहरीन आणि इराक या देशांमध्ये निर्यात होणाऱ्या केळीला या युद्धामुळे मोठा फटका बसला असून निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी, केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.(Banana Export)
अर्धापूर तालुका राज्यात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील केळी मुख्यत्वे खाडी देशांमध्ये निर्यात केली जाते. सध्या प्रतिक्विंटल केळीला फक्त १ हजार ५०० रुपये एवढा दर मिळत आहे, जो उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच अपुरा आहे.(Banana Export)
वादळाने आधीच संकट; आता युद्धाचा फटका
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची झाडे उन्मळून पडली होती. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी सावरत असतानाच, आता खाडीतील युद्धामुळे निर्यात कमी झाली आहे.
देशांतर्गत बाजारही मंदावले
अर्धापूरमधील चांगल्या दर्जाच्या केळीचे घड सध्या निघत आहेत, मात्र त्याला योग्य दर मिळत नाही. देशांतर्गत हरियाणा, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, श्रीनगर, पंजाब आदी बाजारपेठांतून केळी व्यापाऱ्यांकडून मागणी कमी झाल्याचे दिसते.
त्यामुळे व्यापारी वादळात पडलेल्या मालाचा हवाला देत दर वाढवत नाहीत. पण प्रत्यक्षात वादळात पडलेला साठा संपला असून, सध्या बाजारात येणारा माल चांगल्या दर्जाचा आहे.
शेतकऱ्यांची मागणी
केळीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. सुरुवातीला निर्यातीची आशा होती, पण युद्धामुळे आमचे दर कोसळले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन निर्यात धोरणात तातडीने हस्तक्षेप करावा, आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.