जळगाव जिल्ह्याचा मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ३५ अंशांवर गेला आहे आणि त्याचा फटका भाजीबाजाराला बसला आहे. एकीकडे लाल मिरची स्वस्त असताना दुसरीकडे हिरव्या मिरचीचे दर मात्र ८० रुपये किलोंवर भिडले आहेत. त्यासोबतच कोथिंबीरही महागली असून 'गवार' मात्र बाजारात शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात स्थानिकसह नाशिक, नंदुरबार, धुळे, इंदौर भागातून हिरव्या मिरचीची आवक होते. तसेच तेज असणारी बारीक हिरवी मिरची सिल्लोड, सोयगाव, मलकापुर, बुलढाणासह अन्य भागातून येते. यंदा शेजारच्या जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात महागणारी मिरची यंदा मात्र मार्च महिन्यातच दरवाढीचा रंग घेऊन बसली आहे.
तेजीत असलेला .. लसूण घसरला
४०० रुपये किलोंवर गेलेला लसूण जमिनीवर आला आहे. सध्या गावरानी लसूण ३०० रुपयांवर स्थिरावून आहे. तर पांढरा लसूण १५० ते २०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सध्या दिलासा मिळताना दिसत आहे.
'लिंबू' मात्र पिळतोय
सध्या लिंबूची आवक चांगली आहे. मात्र दर तेजीत आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी दीडशे रुपयांवर गेलेला लिंबू सध्या १०० ते १३० रुपये किलोने विक्री होत आहेत. मात्र उन्हाचा पारा चाळिशीवर गेल्यानंतर थंडपेय विक्रेत्यांकडून मागणी वाढेल आणि त्यानंतर लिंबूचा बाजार तेजीत येईल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
जानेवारी आणि मार्चमधील दर (प्रतिकिलो)
भाजी | जानेवारी | मार्च |
हिरवी मिरची | ५०/६० | ८०/९० |
सिमला मिरची | ५०/६० | ७०/८० |
वांगी | २५/३० | २०/२५ |
भरताचे वांगी | ३०/४० | ४०/५० |
मेथी | ३०/४० | ७०/८० |
पत्ता कोबी | २०/३० | २५/३० |
फुलकोबी | २०/३० | ३५/४० |
गवार | ६०/७० | १००/१२० |
कोथिंबीर | ३०/४० | ७०/८० |