अहिल्यानगर : शेतकरी बांधवांनी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करत असताना सदर निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात.
तसेच खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की बिले घ्यावीत, यातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून, काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. परंतु अनेकदा शेतकऱ्यांची बियाणे तसेच खतांमध्ये फसवणूक होते. त्यामुळे कृषी विभागाने यामध्ये लक्ष घातले असून, शेतकऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत.
शासनमान्य अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, त्या विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बियाण्याचे पाकीट किंवा पिशवी सीलबंद असल्याची खात्री करून घ्यावी.
घरातील सातबाराधारकाच्या नावाने शक्यतो बियाणे खरेदी करावे, याशिवाय खते खरेदी करताना जमीन आरोग्यपत्रिकेनुसार व पिकाच्या गरजेनुसार खताची मात्रा ठरवून अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून पक्के बिल घेऊनच खते खरेदी करावे.
खरेदीचे बिल पिकांचा हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे, संयुक्त खतांऐवजी सरळ खतांचा वापर करावा, कीटकनाशके खरेदी करताना एका वेळेस संपूर्ण फवारणीसाठी आवश्यक तेवढेच औषध खरेदी करावे.
फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणत्याही स्थितीत फेरीवाल्याकडून किंवा इतर अनधिकृत दुकानातून खते, बियाणे खरेदी करू नये, यातून फसवणूक होऊ शकते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी तक्रार व्हाट्सअॅप हेल्पलाइनशेतकरी बांधवांना खते, बियाणे विक्री करणारे केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी सक्ती करत असतील अथवा चढ्या भावाने विक्री करत असतील तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत आपली तक्रार असेल तर ९८२२४४६६५५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पुराव्यासह तक्रार पाठवावी. त्यावर शहानिशा करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
तक्रार असेल तर संपर्क कराशेतकऱ्यांना बी, बियाणे किंवा खतांबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० यावर संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेत कृषी विभागाशी संपर्क करावा.
शेतकरी बांधवांनी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करत असताना सदर निविष्ठा परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी कराव्यात, तसेच खरेदी केलेल्या निविष्ठांची पक्की बिले घ्यावीत. निविष्ठा खरेदी करत असताना लिंकिंग अथवा अन्य गैरप्रकार आढळून आल्यास नजीकच्या कृषी कृषा विभागाशी अथवा कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकाशी तत्काळ संपर्क साधावा. शेतकरी बांधवांना येणाऱ्या समस्येचे निराकरण तात्काळ करण्यात येईल. - सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर
अधिक वाचा: दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर