जालिंदर शिंदेघाटनांद्रे : साखर सम्राटांचा पट्टा म्हणून सांगली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. सतरा साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. म्हणजे येथे ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे आपसूकच ऊसतोडही आली आणि ऊसतोड मजूरही आलेच. ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे येथे संघर्षमय जीवन जगत आहे.
निसर्गाची नेहमीच अवकृपा असलेल्या बीड, धाराशिव, अहमदनगर तसेच सांगली जिल्ह्यांतीलही काही तालुक्यांतूनही ऊसतोड हे मजूर आपल्या कुटुंबासह ऊस तोडणीसाठी या जिल्ह्यात येत असतात.
ऊस तोडणीसाठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे हे काम सुरू असते. सदर ऊसतोड मजुरांना त्यांच्या कुटुंबातील महिलावर्गाचीही यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचेही काम हे त्या करत असतात.
लहान-लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा झोळीत त्यांचा सांभाळ होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, काट्याचे भय कधी वाटतच नाही.
वर्षातील सहा महिने हे मजूर गावी तर सहा महिने कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये मोठी परवडच होत असते. त्यांना महामंडळ स्थापन करून त्याचा लाभ कधी मिळणार, हे प्रश्न अधांतरीच राहिले आहेत.
शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचेऊसतोड कामगार हे शासन, साखर कारखानदार व मुकादमांकडून दुर्लक्षित आहेत. ऊसतोड कामगारांच्या कामाचे मूल्यांकन होत नाही. त्यांना आठवडी सुटी नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत. अनेकांना लहान-सहान दुखापत तर होतेच शिवाय कित्येकांचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.
कोरडवाहू शेती असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी कारखान्याची उचल घ्यावी लागते. पहाटेपासून थंडीची पर्वा न करता ऊसतोडणी करावी लागते. दररोज पंधरा ते वीस टन तोडणी होते. पोटासाठी तर काम करावेच लागणार. ऊसतोडीसाठी कुठल्या गावात जायचं, हे आम्हालाबी माहिती नसतं. चार-आठ दिसाला गाव बदलावं लागतं. - शाबू बजंत्री, ऊसतोडणी कामगार, जत