मराठवाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर वसलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा वैजापूर तालुका म्हणजे गोदावरीच्या गंगाथडीला प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन पिकांचा तर उर्वरित डोंगरथडीला बाजरी आणि भुईमूग पिकांचा बालेकिल्ला. मात्र अलीकडे एक-दोन वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलतांना दिसून येत आहे.
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शिऊर तसेच परिसरातील निमगाव, कोरडगाव, खरज, चित्तरखेडा, आलापुरवाडी, चिकटगाव, खंडाळा, जानेफळ या पट्ट्यात आता तूरशेती मोठ्या स्वरूपात उभारी घेत आहे. ज्यातून उत्पादक शेतकरी देखील समाधानी होतांना दिसून येत आहे.
अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरीतूरशेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.
दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या मार्फत विकसित झालेले गोदावरी तूर वाण मर रोगास प्रतिबंधित असल्याने तसेच चांगल्या जमिनीत योग्य व्यवस्थापन केल्यास ८-१० क्विंटलहून अधिक उतारा देत असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीत येत आहे.
कमी कष्टात यंदा तब्बल १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची आशा
पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आधुनिक शेततले उभारत, सोलार सुविधेचा उपयोग करत निमगाव (ता. वैजापूर) येथील रामा रतन त्रिभुवन भाजीपाला आणि तूर शेती करतात. ज्यात यंदा त्यांनी गोदावरी वाणाच्या तुरीची ६ फुट बाय १ फुट अंतरावर टोकन यंत्रांच्या मदतीने लागवड केली होती.
या तूर शेतीतून त्यांना अगदी अल्प कष्टात तब्बल १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची आशा आहे. ज्यामुळे यंदा इतर पिकांच्या तुलनेत तूर सर्वच बाबतीत फायद्याची ठरल्याचे रामा त्रिभुवन आवर्जून सांगतात.
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तूर पिकाकडे वळावे
दरम्यान, त्रिभुवन यांच्या या तूर शेतीला नुकतीच विद्यापीठाचे विभागीय कृषि विस्तार कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील कृषि सहाय्यक रामेश्वर ठोंबरे तसेच बाजरा संशोधन केंद्र वैजापूरचे नानासाहेब कुंदे यांनी भेट देऊन पीक पाहणी केली.
यावेळी ठोंबरे यांनी मंजुरांची टंचाई, पारंपरिक कपाशी, सोयाबीन, मका आदी पिकांचा वाढलेला व्यवस्थापन खर्च लक्षात घेता आता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तूर पिकाकडे वळण्याचे आवाहन केले.