कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामात ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठताना सर्वांचीच दमछाक उडाल्याचे चित्र आहे. गाळपाबरोबरच साखर उताऱ्यालाही फटका बसत असल्याने यंदा 'एफआरपी' हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक आहे.
जुलै, ऑगस्टमधील सततचा पाऊस, त्यानंतर उसाच्या वाढीच्या कालावधीत ऊन न मिळाल्याने यंदा उसाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. उसाची वाढ अपेक्षित न झाल्याने अपेक्षित गाळप होणार नाही, हे निश्चित होते.
हंगामाच्या पूर्वी साधारणतः १० टक्के गाळप कमी होईल, असा कारखान्यांचा अंदाज होता. पण, हंगामाच्या मध्यावर गाळपाचा अंदाज आला असून किमान २० टक्क्यापर्यंत हा आकडा जाणार आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या किमान भावात वाढ केली नाही. उसाचे घटलेले टनेज, कमी झालेला साखर उतारा आणि बाजारातील साखरेचे दर पाहता, यंदा 'एफआरपी'चा हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक आहे.
फेब्रुवारीतच कारखाने 'नो केन' साधारणतः मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून साखर कारखान्यांना ऊस कमी पडून 'नो केन' होते; पण, यंदा फेब्रुवारीतच काही कारखान्यांचे 'नो केन' होत आहे. सौदत्ती यात्रा, वाढलेल्या उन्हाबरोबरच उसाचा घटलेला एकरी उतारा है कारण असल्याचे म्हणणे आहे.
गतवर्षीच्या उताऱ्यावर 'एफआरपी' मागील हंगामातील साखर उताऱ्यांवर यंदाचा उसाचा एफआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. मात्र, यंदा उतारा किमान ०.४० टक्क्यांनी कमी असल्याने तो फटकाही कारखान्यांना बसू शकतो.
'एफआरपी' नव्हे; चार हजार दर शक्यकारखानदार जाणीवपूर्वक उतारा कमी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. 'आरएसएफ'नुसार हंगामाच्या शेवटी दर निश्चित केला जात असला तरी खर्च वाढवून 'आरएसएफ'चा दर कमी करण्याचे कारखानदारांचे षडयंत्र आहे. आगामी काळात ते हाणून पाडण्याची भूमिका शेतकरी संघटना घेईल, असे जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने म्हणाले.