Join us

सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसानभरपाईची २७९ कोटी रक्कम; २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:13 IST

Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत.

अरुण बारसकर  

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत.

मागील खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडला होता. खरीप पिकांना बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांना बसला होता. अतिवृष्टी व संततधार पावसाने अनेक दिवस पाणी पिकांत थांबून राहिले. त्याच्या फटक्याने खरीप पिके उद्ध्वस्त झाली.

अतिवृष्टी व संततधार पावसाने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला इंटिमेशन देणे अपेक्षित होते. ज्यांनी ७२ तासांच्या आत कंपनीला कळविले त्या शेतकऱ्यांना घसघशीत नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मिळाली आहे.

तशी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली असली तरी खरीप पिकांचे अधिक क्षेत्र असलेल्या बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व द. सोलापूर तालुक्याला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सर्वाधिक दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी नुकसानभरपाई प्रथमच मिळाली आहे. या अगोदर एवढी रक्कम मिळाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी पीक नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा केला.

तालुका शेतकरी रक्कम 
अक्कलकोट ३८,६९७ ४३.१५ 
बार्शी ८९,९०० ११४.१२ 
करमाळा १२,८६९ ८.७१ 
माढा २२,८०० १४.०४ 
माळशिरस १५२ १.४१ 
मंगळवेढा २७,०९३ १४.२८ 
मोहोळ ८,८५६ २२.०९ 
पंढरपूर ९,५१ २.२९ 
सांगोला ३,२१४ ५.४८ 
उ. सोलापूर १२,५१९ ३४.८१ 
द. सोलापूर २०,४४४ १८.३७ 
एकूण २,३८,९०३ २७८.७२ 

(रक्कम कोटी व लाखात आहेत)]

चार प्रकारांची नुकसानभरपाई

• व्यापक नैसर्गिक आपत्ती (विमा क्षेत्राच्या २५ टक्के इंटिमेशन आल्यास) ही नुकसानभरपाई विमा कंपनीकडून मिळते. बार्शी तालुक्यातील आठ मंडळातील ३३ हजार २०४ शेतकऱ्यांना २० कोटी १६ लाख रुपये मिळाले आहेत.

• स्थानिक नैसर्गिक आपत्तीची जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील एक लाख ३२ हजार शेतकऱ्यांना १७६ कोटी ६५ लाख रुपये, काढणी पश्चाच ५१ हजार २२६ शेतकऱ्यांना ८० कोटी २१ लाख रुपये, तर उत्पन्नावर आधारित करमाळा तालुक्यातील ११७७शेतकऱ्यांना २१ लाख ४२ हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यातील ११ हजार ९६९ शेतकऱ्यांना ८४ लाख ८८ हजार रुपये, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार ५४६ शेतकऱ्यांना ६३ लाख ८८ हजार रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :खरीपपीक विमाशेतकरीशेतीशेती क्षेत्रसोलापूर