राज्यात विविध योजनांमध्ये बसविलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तर आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत.
सौर कृषिपंपांच्या बिघाडाबाबत येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करता येईल, अशी सुविधा महावितरणने उपलब्ध केली आहे.
शेतकऱ्यांना टोल फ्री नंबरवर, वेबसाइटवर किंवा थेट संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर नोंदणी करून तक्रार नोंदविता येईल. तक्रार नोंदविताना सौर कृषिपंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तरी पुरेसे आहे.
आपला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहूनही तक्रार करता येईल. जिल्हा, तालुका, गाव व स्वतःचे नाव अशी माहिती देऊनही तक्रार करता येईल, असे महावितरणने कळवले आहे.
पाच वर्षे दुरुस्तीची जबाबदारी कंपनीवर!
• सौर कृषिपंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीवर आहे.
• शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक आहे.
• सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक आहे.
• तक्रारीचे निराकरण झाल्यावर मोबाइलवर एसएमएस येईल.
• तक्रारी व निराकरण याबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील.
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती