एका बाजूला यंदा कमी पडलेला पाऊस, दुसऱ्या बाजूला कांदा-टोमॅटो अशा पिकांना मिळणारा मातीमोल दर अशा कोंडीत बळीराजा सापडलेला असतानाच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्जदार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांचे १०३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून अजूनही शासन दखल घेत नसल्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून कुठल्याही क्षणी उड्या मारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा बँक वसुली पीडित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. मागचे तीन चार वर्षे अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती खालावली असून ते कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने अशा नोटीसा आल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी शेतकरी १०३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान आज ११ सप्टेंबर रोजी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी आंदोलकांची बैठक बोलावून टोकाचा निर्णय न घेण्याबाबत नोटीस बजावली. मात्र आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी येऊन याबाबत उपस्थित शेतकऱ्यांची सविस्तर चर्चा करण्यात केली तेव्हा शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.
नाशिक जिल्हा बँक जप्ती: आंदोलक शेतकरी घेणार मंत्रालयावरून उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:27 IST