जळगाव : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हे पुरस्कार अभियान राबविले जात आहे.
या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ लाख रुपयांच्या तरतुदीस राज्य शासनाने मान्यता दिली असताना आता ग्रामपंचायतींना कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे. या अभियानात १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार असून अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर, २०२५ असा राहिल. या अभियानात सात मुख्य घटक आहेत.
यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ अशा घटकांचा समावेश आहे.
या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड होणार आहे. ग्रामपंचायतींसोबत पंचायत समिती व जिल्हा परिषदांनाही पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कोट्यधीश होण्याची संधी आहे.
ग्रामपंचायतीसाठी पुरस्कारराज्यस्तर : ग्रामपंचायतीसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.विभागस्तर : विभागस्तरीय पुरस्कारात विभागनिहाय पहिल्या ३ ग्रामपंचायती अशा १८ ग्रामपंचायतींना अनुक्रमे १ कोटी, ८० लाख आणि ३० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्हास्तर : जिल्हास्तरासाठी ३४ जिल्ह्यातील एकूण १०२ ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३० लाख आणि तृतीयसाठी २० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.तालुकास्तर : तालुकास्तरावर (१०५३ पुरस्कार) ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी १५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी १२ लाख, तृतीय क्रमांकासाठी ८ लाख रुपये अशा एकूण १ हजार ५३ ग्रामपंचायती आणि ५ लाख रुपयांचे दोन विशेष पुरस्कार (७०२ पुरस्कार) देण्यात येणार आहेत.
Bhajani Mandal Yojana : गावात तुमचं भजनी मंडळ आहे, मग इथं अर्ज करा, मिळतंय 25 हजार रुपयांचं अनुदान