Join us

शेतकऱ्यांना द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाण्याची भीती का आहे? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:08 IST

Grape Farming : द्राक्षाच्या हंगामावर संकट निर्माण झाले असून नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत सापडले आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतीमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शेतीपिकांना पावसाचा (Rain) जोरदार फटका बसला आहे. द्राक्षाच्या हंगामावर संकट निर्माण झाले असून नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत सापडले आहे.

मे महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने द्राक्ष शेतीवर (Grape Farming) विपरीत परिणाम झाला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिळाल्याने द्राक्ष शेतीवर करपा, डावणी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संततधार सुरू असल्यामुळे द्राक्ष बागांवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांना कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करता येत नसल्याने रोगांचा होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे कठीण होत आहे.

द्राक्ष बागेत पूर्णतः चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पाठीवर शिकाऱ्या घेऊन पावडरची फवारणी करावी लागत आहे. 

युद्धपातळीवर उपाययोजना सुरूद्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. जर द्राक्ष बागांची मालकाडी तयार झाली नाही तर त्याचा परिणाम फळधारणेवर होईल. त्यामुळे द्राक्षाचा पुढील हंगाम धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

तसेच ज्या द्राक्ष बागांची 3 एप्रिलमध्ये छाटणी झाली आहे, तसेच मालकाडी चांगली परिपक्व झाली तर फळधारणा होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी एप्रिलमध्ये छाटणी झाल्यानंतर मालकाडी बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु, यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत द्राक्षबागांची एप्रिलमध्ये छाटणी झाल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढले. द्राक्ष शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, मालकाडी तयार होण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम फळधारणेवर होत आहे. द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाण्याची भीती आहे.- तुषार ढिकले, द्राक्ष उत्पादक शेतकरी

टॅग्स :शेती क्षेत्रद्राक्षेशेतीपीक व्यवस्थापनपाऊस