- रतन लांडगे
स्वतःची एक गुंठा जमीन नसतानाही, केवळ मनगटातील बळ आणि अफाट कष्टाच्या जोरावर कुणी यशाचे शिखर गाठू शकतं का? याचं जिवंत आणि सळसळतं उत्तर म्हणजे पवनी तालुक्यातील वडेगावचे रवींद्र गजबे.
'पेरावे तसे उगवते' या उक्तीला सार्थ ठरवत, गेल्या १५ ते २० वर्षांपासून पवनी-भंडारा मार्गावरील सिंधपुरी येथील पाच-सहा व अन्य ठिकाणची मिळून जवळपास दहा एकर भाड्याच्या शेतीत घाम गाळून त्यांनी आज लाखांची उलाढाल केली आहे. एका भूमिहीन शेतकऱ्याचा हा 'शून्य ते विश्व' प्रवास आज संपूर्ण परिसरासाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.
वीस वर्षापूर्वी जेव्हा पोटाची खळगी भरण्याचे आव्हान समोर होते, तेव्हा रवींद्र गजबे यांनी हार न मानता दुसऱ्याची जमीन कसण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वतःची मालकी नसली तरी, त्या मातीवर त्यांनी स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम केले. गेल्या दोन दशकांपासून अहोरात्र कष्ट करून त्यांनी भाड्याने घेतलेल्या शेतीत नगदी पिके आणि भाजीपाल्याचा असा काही प्रयोग केला की, आज ती जमीन सोन्याचा घास देऊ लागली आहे.
केवळ पारंपरिक शेतीवर विसंबून न राहता गजबे यांनी बाजारपेठेचा कानोसा घेतला. भाजीपाला उत्पादनात त्यांनी घेतलेले सातत्य आणि नगदी पिकांचे अचूक नियोजन यामुळे त्यांना लाखोंचा नफा मिळू लागला. त्यांच्या शेतात डोलणारी हिरवीगार पिके ही केवळ झाडे नसून, त्यांच्या कष्टाची उमललेली फुले आहेत.
शेती करण्यासाठी स्वतःची जमीन असण्यापेक्षा, शेतीवर प्रेम करणारं मन आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते. माती कधीच कुणाला उपाशी निजवत नाही, फक्त तिला घामाचं पाणी द्यावं लागतं, हेच रवींद्र गजबे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलंय. त्यांच्या या प्रवासाला वडेगावसह परिसरातील शेतकरी सलाम ठोकत आहेत.
संसाराचा गाडा आणि स्वप्नपूर्ती
शेतीतून मिळणाऱ्या या 'घामाच्या पैशाने' त्यांनी आपल्या कुटुंबाचे नंदनवन फुलवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या कुठल्याही कर्जाच्या ओझ्याशिवाय समर्थपणे पेलल्या. आजच्या काळात जिथे शेती तोट्याची म्हणून तरुण पिढी शहराकडे धावत आहे, तिथे रवींद्र गजबे यांनी श्रमाच्या जोरावर शेतीतून समृद्धीचा मार्ग दाखवून दिला आहे.
