Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shetkari Karjmafi : राष्ट्रीयीकृत की जिल्हा बँक? शेतकऱ्यांचे कर्ज नेमके कोणाचे माफ होणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:10 IST

Shetkari Karjmafi : कर्जमाफी फक्त काही बँकांसाठीच आहे, अशा चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Shetkari Karjmafi)

Shetkari Karjmafi : राज्यातील शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. (Shetkari Karjmafi)

राष्ट्रीयीकृत बँक असो किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांकडून घेतलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज सरकार माफ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Shetkari Karjmafi)

अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या कर्जमाफीबाबत विविध अफवा आणि संभ्रम पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर केल्या. 

अमरावती रोडवरील लिंगा येथे सुमारे ४४ हजार ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या 'एक्सियो ॲडव्हान्स इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग पार्क' या प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बँकेचा निकष नाही; शेतकरी हित सर्वांत महत्त्वाचे

कर्जमाफी केवळ काही विशिष्ट बँकांपुरती मर्यादित असेल, अशी चर्चा काही ठिकाणी सुरू होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले की, 'कोणी म्हणते राष्ट्रीयीकृत बँकांची माफी होईल, तर कोणी म्हणते जिल्हा बँकांची माफी होणार नाही.

मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या-ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या सर्व बँकांकडून घेतलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.'

सरकारचे उद्दिष्ट बँकांना फायदा करून देणे नसून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हेच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा

कर्जमाफीबरोबरच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने प्रोत्साहनपर निर्णय घेतला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत बोनस स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे.

यामुळे थकीत कर्जदारांसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही कर्जमाफी योजना पूर्वीच्या योजनांपेक्षा अधिक प्रभावी आणि पारदर्शक असेल. यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन केली असून ती नियमावली तयार करण्याचे काम करत आहे.

सरकारचे लक्ष्य ३० जूनपूर्वी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे असल्याची माहितीही त्यांनी दिली. लवकरच या योजनेचे सविस्तर नियम जाहीर केले जाणार आहेत.

नागपूर होणार लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब

लिंगा येथील औद्योगिक प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विदर्भात औद्योगिक गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे.

मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असून नागपूर लवकरच देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखले जाईल.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारने अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले.

हे ही वाचा सविस्तर : Shetkari Karjmafi Yojana : कर्जमाफीची घोषणा; पण शेतकरी म्हणतात- आम्हाला काय मिळाले?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farm Loan Waiver: All Farmers to Benefit, Fadnavis Assures

Web Summary : CM Fadnavis assures all Maharashtra farmers, regardless of bank, will benefit from the loan waiver up to ₹2 lakh. The government aims to complete the process by June 30, also offering incentives for regular loan repayments. Nagpur is becoming a logistics and manufacturing hub.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक कर्जकृषी योजना