भंडारा : धान उत्पादनाला फाटा देत लाखनी तालुक्यात फलोत्पादनशेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्याकडे कृषी विभाग सरसावला आहे. अवघ्या ४२ महिन्यांत केसर आंबा फळाला आला असून, प्रती झाड किमान पाच किलो आंबा मिळणार आहे. त्यातून शेतकऱ्याला एका झाडापासून किमान ३०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
भंडारा जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून धान पिकाची ओळख असली तरी सध्याच्या परिस्थितीत धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्च वाढ, तसेच विक्रीतील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या खरिपातील ७७हजार ६७८ शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख क्विंटल धान विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.
बदलत्या जीवनमानामुळे फळांना वाढती मागणी असून आंबा, केळी, बोर, फणस, पपई, ड्रॅगन फ्रूट, पेरू आदी पिकांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. त्यामुळे फलोत्पादन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर, मुंडीपार, सिंधीपार, मोरगाव, परसोडी, राजेगाव, कवडशी या गावांमध्ये सघन व अतिघन पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. फलोत्पादनातून एका एकरात मुख्य पिकातून दोन लाख व आंतरपिकातून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
भाजीपाला, टरबूज व फूलपिकांमधून अतिरिक्त नगदी उत्पन्न मिळत आहे. शासनाकडून शेती साहित्यावर ८० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध असून, इस्रायल पद्धतीने उंच सरी-वरंबा व ठिबक सिंचनामुळे बागायती अधिक सक्षम होत आहेत.
आंतरपिकातून नगदी उत्पन्न मिळते, तर चार वर्षांनंतर वार्षिक उत्पन्न वाढत जाऊन आर्थिक सुबत्ता शक्य आहे. फक्त प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.
- किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी.
Read More : मुरघास संयंत्र वाटप योजनेत बदल, आता शेतकरी समूहगटांचा समावेश, वाचा पात्रता आणि अटी
