नाशिक : शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी (Ration Card ekyc) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. ३० एप्रिलपर्यंत त्यासाठी अंतिम मुदत दिली होती.
मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण ३८ लाख ७३ हजार ३०५ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यापैकी ३० लाख ४२ हजार १०१ शिधापत्रिका-धारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, आठ लाख ३१ हजार २०४ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात ७८ टक्के शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मेरा-केवायसी ॲप वापरावेई-केवायसी करण्यासाठी शासनाने मेरा केवायसी ॲप विकसित केले आहे. या ॲपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या ॲपवर शिधापत्रिकाधारकांना आधार आधारित फेस व्हेरिफिकेशन करावे लागते. तसेच ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्या शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया मुदतीच्या आत पूर्ण करून घ्यावी.- कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)