Agriculture News : शासकीय योजना म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार आणि कागदी घोडे नाचवणे, असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा ग्रामपंचायतीने हा समज दूर केला आहे. ज्या स्मशानभूमीच्या नावाखाली लोक जायलाही धजावत नसत, त्याच स्मशानभूमीच्या काळजात चक्क ३ हजार फळझाडांचे "नंदनवन" फुलवून एकारा गावाने प्रशासनाला आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केवळ रस्ते किंवा खड्डे खोदले जातात, हा समज एकारा ग्रामपंचायतीने खोडून काढला. या योजनेचा वृक्ष लागवड प्रकल्पासाठी वापर करत येथील वन विभागाच्या विश्रामगृहाजवळील स्मशानभूमीच्या परिसरात फळबागांची निर्मिती केली आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांच्या जिद्दीतून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
केवळ वृक्षारोपण करून ही ग्रामपंचायत थांबली नाही, तर त्याला आयसीआयसीआय फाउंडेशनच्या तांत्रिक पाठबळाची जोड दिली. फलोत्पादन मूल्य साखळी अंतर्गत येथे चिकूसह विविध फळ पिकांवर भर देण्यात आला आहे. 'प्रकल्प वन्य जीवन' अंतर्गत या फळबागांचे वन्यजिवांपासून संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
या ३ हजार फळझाडांमुळे भविष्यात ग्रामपंचायतीला हक्काचे उत्पन्न मिळणार असून, अनेक हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीसारख्या दुर्लक्षित जागेचा असा उत्पादक वापर करणे, हा ग्रामीण विकासातील एक मौलाचा टप्पा मानला जात आहे.
आयसीआयसीआय फाउंडेशनने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सरकारी अनुदानावर डोळा ठेवून कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गर्दीत, एकारा ग्रामपंचायतीने नवनिर्माणाचा ध्यास घेतलेला आहे. स्मशानभूमीच्या रुक्ष जागेवर हिरवेगार नंदनवन फुलवणे ही केवळ वृक्षलागवड नसून, ती ग्रामीण मानसिकतेत झालेली एक मोठी क्रांती आहे.
शासकीय योजनांचा निधी फक्त खर्च करायचा नसून, तो समाजपरिवर्तनासाठी कसा वापरायचा, याचा आदर्श वस्तूपाठ एकारा ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. स्मशानभूमीच्या दुर्लक्षित जागेवर तीन हजार फळझाडांचे नंदनवन फुलवणे ही बाब प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. 'मग्रारोहयो' आणि 'आयसीआयसीआय फाऊंडेशन"च्या समन्वयातून उभा राहिलेला हा प्रकल्प तालुक्यासाठीच एक रोल मॉडेल ठरेल.
- रवींद्र घुबडे, सहायक गट विकास अधिकारी, पंचायत समिती, ब्रह्मपुरी.
स्मशानभूमीच्या नावाखाली लोक वर्षानुवर्षे तिथे जायला घाबरत होते. पण, आम्ही त्याच जागेला गावाच्या प्रगतीचे केंद्र बनवलंय. लोक म्हणायचे शासकीय योजनेत फक्त खाबुगिरी चालते, पण आम्ही 'मग्रारोहयोचा पैसा मातीत पेरला आणि आज तिथे ३ हजार फळझाडांचं नंदनवन उभं आहे आयसीआयसीआय फाउंडेशनच्या साथीने आम्ही भयाच रूपांतर भवितव्यात केल आहे.
- सचिन राऊत, ग्रामसेवक, एकारा
आता पोस्ट ऑफिसमध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी आणि आधार अपडेट करून मिळेल, वाचा सविस्तर
Web Summary : Eklara village transformed a feared cemetery into a thriving orchard with 3,000 fruit trees under MGNREGA. The initiative, supported by ICICI Foundation, provides income, employment, and environmental benefits, setting a rural development example.
Web Summary : एक्लारा गांव ने मनरेगा के तहत 3,000 फलों के पेड़ों के साथ एक डरावने कब्रिस्तान को एक संपन्न बाग में बदल दिया। आईसीआईसीआई फाउंडेशन द्वारा समर्थित यह पहल आय, रोजगार और पर्यावरणीय लाभ प्रदान करती है, जो ग्रामीण विकास का एक उदाहरण स्थापित करती है।