Pik Vima Yojana : एकीकडे शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. अशा स्थितीत सरकारने पीक विमा योजनेत सहभागाची तारीख वाढवून १४ ऑगस्ट केली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने २०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेत बदल करत सुधारित पीक विमा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनावर आधारित आणि ८०:११० या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या होत्या. या योजनेची अंतिम मुदत ही ३१ जुलै पर्यंत होती. मात्र या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले.
या सुधारित पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी अतिशय कमी सहभाग नोंदविला. त्यामुळे या योजनेची मुदत वाढविण्यात आली असून आता १४ ऑगस्ट पर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे. या मुदत वाढीनंतर देखील किती शेतकरी सहभागी होतील, याची शाश्वती नाही. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
कसा घ्या सहभाग योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दि. १४ ऑगस्ट २०२५ आहे. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पिक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल.