सागर कुटे
देशात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकरी अजूनही रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे चित्र समोर येत आहे.(Organic Farming)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते. (Organic Farming)
मात्र, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशासह महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत खतांच्या वापरात सातत्याने वाढ झाली आहे.(Organic Farming)
तज्ज्ञांच्या मते, रासायनिक खतांचा वाढता वापर आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे दुष्परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर, पर्यावरणावर, पाण्याच्या गुणवत्तेवर आणि मानवी आरोग्यावरही गंभीरपणे जाणवू लागले आहेत.(Organic Farming)
देशातील खत वापरात मोठी वाढ
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २०२१-२२ मध्ये एकूण २९७.९६ लाख टन खतांचा वापर झाला होता. हा वापर २०२४-२५ मध्ये वाढून ३२९.२८ लाख टनांवर पोहोचला आहे. यावरून शेतीत रासायनिक खतांवरील अवलंबित्व किती वाढले आहे, हे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, देशातील खत उत्पादन आणि आयात या दोन्हीमध्ये चढ-उतार होत असले तरी मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातही झपाट्याने वाढ
महाराष्ट्रात खतांच्या वापरात गेल्या दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे.
२०२२-२३ मध्ये राज्यात २८२३.३२ हजार टन खतांचा वापर झाला.
२०२३-२४ मध्ये हा आकडा वाढून २९१८.७१ हजार टनांवर गेला.
तर २०२४-२५ मध्ये वापर थेट ३२७४.१७ हजार टनांवर पोहोचला आहे.
ही वाढ राज्यातील शेती अधिकाधिक रासायनिक पद्धतीकडे झुकत असल्याचे संकेत मानले जात आहेत.
खत आयातीवर देशाचे वाढते अवलंबित्व
देशात खतांची मागणी वाढत असताना उत्पादन त्यानुसार वाढत नसल्याने भारताला मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागत आहे.
२०२२-२३ मध्ये भारताने १०१.६२ लाख टन खत आयात केले होते. तर २०२४-२५ मध्येही ७७.३७ लाख टन खतांची आयात करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव, आखाती युद्ध आणि जागतिक राजकीय घडामोडींचा खतांच्या किमतींवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला खत आयातीसाठी अधिक खर्च करावा लागत असून त्याचा फटका शेती अर्थकारणाला बसत आहे.
वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत
युरिया, डीएपी आणि पोटॅश खतांच्या किमती वाढल्याने शेतीचा उत्पादन खर्चही वाढत आहे. अनेक शेतकरी वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडत असून कमी उत्पन्नात अधिक गुंतवणूक करावी लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होत आहे. पूर्वी कमी खतांत चांगले उत्पादन देणारी जमीन आता अधिक खतांशिवाय उत्पादन देत नाही. परिणामी शेतकरी रासायनिक खतांच्या साखळीत अडकत चालले आहेत.
जमिनीची सुपीकता धोक्यात
शेतीत सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव, गांडुळे आणि पोषक घटक नष्ट होत असल्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत असून माती 'जिवंत' राहत नसल्याचे सांगितले जात आहे.
याचा परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनक्षमतेवर होत असून रोगराईचे प्रमाणही वाढत आहे. याशिवाय रासायनिक अवशेषांमुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सेंद्रिय शेतीचा पर्याय; पण अनेक अडचणी
केंद्र सरकार सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत.
सेंद्रिय शेतीसाठी लागणारा अधिक कालावधी, सुरुवातीच्या काळात उत्पादनात होणारी घट, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि पुरेशा प्रशिक्षणाचा अभाव यामुळे अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक रासायनिक शेतीवरच अवलंबून आहेत.
तज्ज्ञांच्या मते, सेंद्रिय शेतीचा प्रसार वाढवण्यासाठी केवळ आवाहने करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत, हमी बाजारपेठ आणि तांत्रिक मार्गदर्शन देणेही तितकेच आवश्यक आहे.
अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच
Web Summary : Despite organic farming promotion, Maharashtra sees record fertilizer use. Farmers depend on chemical fertilizers, impacting soil, environment, and health. Increased fertilizer imports strain the agricultural economy, burdening farmers with rising costs and jeopardizing soil fertility.
Web Summary : जैविक खेती को बढ़ावा देने के बावजूद, महाराष्ट्र में उर्वरक का उपयोग रिकॉर्ड स्तर पर है। किसान रासायनिक उर्वरकों पर निर्भर हैं, जिससे मिट्टी, पर्यावरण और स्वास्थ्य पर असर पड़ रहा है। बढ़ते उर्वरक आयात से कृषि अर्थव्यवस्था पर दबाव बढ़ रहा है, जिससे किसानों पर लागत का बोझ बढ़ रहा है और मिट्टी की उर्वरता खतरे में है।