Join us

Onion Damage : कांद्याचा हंगाम ओलाचिंब… शेतकऱ्यांचे सारे गणित कोलमडलं! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:30 IST

Onion Damage: कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अन् पदरी राख, अशी अवस्था होते.(Onion Damage)

नितीन कांबळे

कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अन् पदरी राख, अशी अवस्था होते. (Onion Damage)

कांदा उत्पादनातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी नगदी पीक म्हणून कांद्याची लागवड केली. उसनवारी, घरातील बचत, शेतीसाठी घेतलेली कर्जांवर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली.  (Onion Damage)

काहींनी कांदा काढून शेतात भरून ठेवला, तर काहींनी गोण्यांमध्ये भरून साठवणूक सुरू केली होती. मात्र, अवकाळी आणि आता पडणाऱ्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने या सर्व मेहनतीवर अक्षरश: पाणी फेरले.(Onion Damage)

बीड जिल्ह्यातील कडा तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन शेतातच कुजण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे गोण्या भरलेला कांदाही चिखलात मिसळला आहे. (Onion Damage)

शेतकऱ्यांची हतबलता

कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांची सर्व आशा या पिकावर असते. पण भाव मिळेपर्यंत थांबण्यासाठी कांदा शेतातच ठेवणे ही एक पारंपरिक पद्धत आहे. मात्र, हवामानाची अनिश्चितता आणि वेळेआधी आलेल्या पावसामुळे यंदा या पद्धतीनेही फटका बसला आहे.

कर्ज काढून कांदा लावला. आता ना कांदा राहिला ना पैसा. घर चालवायचं कसं? असा सवाल अनेक शेतकरी करत आहेत.

पंचनामे सुरू

तालुक्याच्या विविध भागांत नुकसान झालेल्या शेतांची पाहणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली असून, पंचनामेही सुरू आहेत, असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले. मात्र, पंचनाम्यानंतर मदत कधी आणि किती मिळणार याविषयी शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.

अवकाळी पावसाने झटका बसला

यंदाचा पाऊस हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा वेगळ्या वेळेस आल्याने आणि एकाच झटक्यात मोठ्या प्रमाणावर झाल्याने कांद्यावर पाणी साचले. साठवलेला कांदा ओलसर माती व चिखलात भिजून त्याची विक्री करण्याजोगी स्थिती राहिलेली नाही.

 "आले तर लाख, नाहीतर चिखल, माती अन् राख!" शेतकऱ्यांच्या या म्हणीतच सध्याची दयनीय अवस्था लपलेली आहे. हजारो रुपयांची गुंतवणूक करून, वेळेवर मजुरी देऊन, उन्हातान्हात कष्ट केल्यानंतर शेवटी अवकाळी पावसाने स्वप्न चुरगाळले, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

मागणी काय?

* शासनाने तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी.

* पीक विम्याची रक्कम त्वरित वितरित करावी.

* शासनाने हवामानाशी सुसंगत साठवणूक केंद्रे उभारावी.

कांद्याच्या माध्यमातून आर्थिक उभारी मिळवण्याच्या अपेक्षेने राबणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. आता त्यांचे सर्व लक्ष शासनाच्या मदतीकडे आहे. वेळेत मदत मिळाली तरच पुन्हा नव्याने शेती करायची उमेद निर्माण होईल.

हे ही वाचा सविस्तर : Onion Damage : तीन एकर कांद्याचं स्वप्न…अन् पावसात वाहून गेलेलं भविष्य! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकांदाबीड