Mrutyupatra : मृत्युपत्र किंवा इच्छापत्र याची व्याख्याच 'एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेबद्दल तिच्या इच्छेचा कायदेशीर दस्तऐवज, जो तिच्या मृत्युनंतर अमलात आणला जावा', अशी कायद्याने केलेली दिसून येते. मुलांची इच्छा काहीही असली, कितीही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव असला, तरी भावनातिरेकापेक्षा प्रॅक्टिकल होऊन आपल्या इच्छेप्रमाणेच मृत्युपत्र केलं गेलं पाहिजे.
एखाद्या मिळकतीत मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीत खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच ठरतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्युपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) आणि मृत्यूपत्र केलं नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन) तबदील होऊ शकतो.
कोणत्याही हिंदू स्त्री-पुरुषांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या वैवाहिक जोडीदाराला, मुलांनाही कुठलाही मालक हक्क मिळत नाही, त्यामुळे सुनबाई/जावई आणि नातवंडं तर खूपच दूर राहिली. अर्थात एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे होते.
यासाठी ढोबळ मानाने वारसांची क्लास - १ - हेअर्स (वारस) आणि क्लास २ - हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस मधून असं आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्याच्या काळात पालकांनी जास्त भावनिक न होता प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. भिडस्त स्वभाव /'नाही म्हणता न येणं' यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि आपण आपलंच मानसिक समाधान गमावून बसतो. ते बाजारात विकत मिळत नाही.
- ॲड. रोहित एरंडे
