Krushi Yantrikikaran Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(Krushi Yantrikikaran Yojana)
महाडीबीटी पोर्टलवरील (MahaDBT Portal) ताज्या आकडेवारीनुसार, गत वर्षभरात निवड झालेल्या अर्जांपैकी तब्बल २६ लाख अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.(Krushi Yantrikikaran Yojana)
११ मार्च २०२६ रोजी पोर्टलवर अद्ययावत झालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी ३२ लाख अर्जांची निवड झाली होती. त्यापैकी २६ लाख अर्ज रद्द करण्यात आले असून ६ लाख अर्ज अद्याप प्रक्रियेत आहेत.(Krushi Yantrikikaran Yojana)
निवड झालेल्या अर्जांच्या तुलनेत रद्द झालेल्या अर्जांचे प्रमाण खूप जास्त असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.(Krushi Yantrikikaran Yojana)
अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३६,०९९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
याशिवाय १,४५,१२७ लाख रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अर्ज रद्द होण्यामागील प्रमुख कारणे
कृषी विभागाच्या माहितीनुसार, अनेक अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे रद्द झाले आहेत. त्यामध्ये खालील कारणांचा प्रामुख्याने समावेश आहे.
*सातबारा आणि ८-अ उताऱ्यांच्या प्रती स्पष्ट नसणे
*बँक पासबुक अपलोड करताना झालेल्या चुका
*कृषी यंत्रांसाठी अधिकृत कोटेशन किंवा टेस्ट रिपोर्ट वेळेत न सादर करणे
*पूर्वसंमती मिळाल्यानंतरही मुदतीत खरेदीची पावती पोर्टलवर अपलोड न करणे
*एकाच घटकासाठी दुबार अर्ज करणे
शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि अचूक अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच पूर्वसंमती मिळाल्यानंतर यंत्र खरेदीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून त्याची पावती पोर्टलवर अपलोड करणेही बंधनकारक आहे.
आधुनिक शेतीसाठी महत्त्वाची योजना
कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, रोटाव्हेटर, हार्वेस्टर यांसारखी आधुनिक अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होतात.
त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढविण्यास आणि मजुरी खर्च कमी करण्यास मोठी मदत होते. मात्र अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका टाळल्या नाहीत तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
