Karjmafi : एकीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अनेक शेती पिकांचे नुकसान केले. त्यात खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक विवंचना आहे. त्यामुळे शेतकरीकर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र दुसरीकडे बँकांकडून कर्ज वसुली केली जात आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी एकजूट होत संबंधित अधिकाऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्यास सुरवात केली आहे.
खरीप हंगामाला (Kharif Season) सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे इतर आवश्यक गोष्टी खरेदी करावयाच्या आहेत. मात्र अवकाळी पावसाने कंबरडे मोडले, मालाला भाव नाही मिळाला. परिणामी कर्ज चुकते कुठून करायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी होईल या आशेवर आहेत.
मात्र बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आता कर्जवसुलीचा त्रास सहन करावा लागत आहे. बँकांचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या घरी, बांधावर जाऊन धडकत आहेत. अशा परिस्थितीत अहिल्यानंगर जिल्ह्यात थेट अधिकाऱ्यांनाच गावबंदी केली जात आहे. या आशयाचे फलक लावण्यात येत आहेत.
स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगरकडून गावागावात कर्जवसुलीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावचे वेशीवर बोर्ड लाऊन कर्जवसुली साठी गावात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. गावच्या परवानगी शिवाय कर्ज वसुलीअधिकाऱ्यांनी गावात प्रवेश करूच नये, अशी ताकीद दिली आहे.
आज 15 जून रोजी सरला, गोवर्धन, रामपूर, नाऊर, महांकाळ वडगांव वेशीवर बोर्ड लाऊन कर्जवसुली अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आपल्या गावात कर्जवसुली अधिकाऱ्यांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी असे बोर्ड लावण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर कडून करण्यात येत आहे.