- सुनील चरपे
नागपूर : कापसाच्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यांचे (Cotton HTBT Seed) सर्वाधिक व खुलेआम उत्पादन गुजरातमध्ये केले जाते. या बियाण्याच्या विक्री व वापरावर राज्य सरकारने महाराष्ट्रात (Maharashtra) बंदी घातल्याने सन २०१५-१६ पासून आजवर शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. बियाण्यांमध्ये हे विशिष्ट जनूक टाकणे शेतकऱ्यांना शक्य नाही. मात्र, सरकार बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई केली जात नाही.
गुजरातमध्ये एचटीबीटी बियाण्याचे उत्पादन (htbt Seed Production) आणि वापर सन २०१४-१५ पासून तर महाराष्ट्रात २०१६-१७ पासून केला जात आहे. याला गुजरातमध्ये आरआर फ्लेक्स (रेडी राउंडअप) संबाेधले जाते. कापसाच्या पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी हे वाण साेयीस्कर असल्याने शेतकरी माेठ्या प्रमाणात वापरतात.
हे वाण गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक असल्याचा अपप्रचार केला जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे, असे मत कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. अलीकडे, एचटीबीटी हे सरळ वाण असल्याचा अपप्रचार केला जात आहे.
४० रुपयांची सरकी दाेन हजार रुपयांत
एचटीबीटी कापूस बियाणे तयार करण्यासाठी एफ-टू जनरेशनच्या कापसाची सरकी वापरली जाते. या सरकीचे दर ४० रुपये प्रतिकिलाेपेक्षा अधिक नाहीत. यात तणनाशक सहनशील जनूक टाकल्यानंतर हीच सरकी एचटीबीटी बियाणे म्हणून दाेन हजार रुपये प्रतिकिलाे दराने विकली जाते. हा प्रकार गुजरातमध्ये खुलेआम सुरू आहे, अशी माहिती बियाणे उत्पादक सूत्रांनी दिली.
पर्यावरणाची चिंता व राेहयाे मजूर
तणनाशक पर्यावरणाला घातक असल्याचा दावा सरकार करीत आहे. तणनाशकाचा वापर वाढू नये म्हणून सरकार एचटीबीटीला अधिकृत परवानगी देत नाही. त्यामुळे पर्यावरणाची चिंता शेतकऱ्यांनीच का करावी, असा प्रश्न विजय जावंधिया यांनी उपस्थित केला असून, सरकारने शेतकऱ्यांना निंदनासाठी राेजगार हमी याेजनेंतर्गत मजूर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उत्पादनावर बंदी का घालत नाही?
मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी तणनाशक वापरल्याशिवाय शेती करू शकत नाही. एचटीबीटी बियाण्यांमध्ये तणनाशक सहनशील जनूक टाकणे काेणत्याही शेतकऱ्याला शक्य नाही. बियाण्यांमध्ये जनूक टाकण्याचे काम बियाणे उत्पादक कंपन्या करतात. बाजारात तणनाशक उपलब्ध आहे. सरकारला पर्यावरणाची एवढीच चिंता आहे तर एचटीबीटी बियाणे आणि तणनाशकाच्या उत्पादनावर बंदी घालून कंपन्यांचे परवाने का रद्द केले जात नाहीत?