नाशिक : कांद्याचे बाजारात भाव टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राने मागणी मंजूर केल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
जयकुमार रावल यांनी सांगितले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत.
त्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी केली आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विविध देशांत कांदा निर्यात होऊन राज्यातील कांद्याचे भाव वाढण्यास मदत होणार आहे.
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची सूचना :तसेच कांदा भाववाढ उपाय योजनेचा भाग म्हणून मंत्री रावल यांनी राज्यातील २८ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, सचिव यांच्याशी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणाली वरून संवाद साधला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य मोबदला देणे ही बाजार समितीची प्रमुख जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रत्येक बाजार समितीने काम करावे.
शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या हेतूने अधिक नफेखोरी करण्यासाठी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बाजार समितीने स्थानिक पातळीवर कडक उपाय योजना करावी, अशा सूचनाही दिल्या असल्याचे जयकुमार रावलांनी सांगितले.
...तर साठेबाजीवर लक्षकांदा बाजारात अफवा पसरवून वेळोवेळी कांद्याचे भाव पाडले जातात. त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यांना कार्यकक्षा ठरवून दिली आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी, नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.