जळगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा पारंपरिक ढाचा आता बदलू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून खरीप हंगामात सातत्याने होणारी अतिवृष्टी सोयाबीन, मूग आणि उडदाच्या मुळावर येत आहे. या पिकांच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याने वैतागलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा उन्हाळी हंगामाकडे वळवला आहे.
गेल्या चार वर्षाचा विचार करता, अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात मूग, उडीद आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार आता शेतीतला ट्रेंड बदलत चालला आहे.
केळी उत्पादकांचा 'मिश्र' फॉर्म्युला
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आता केवळ केळीवर अवलंबून न राहता स्मार्ट शेती करत आहेत. केळीच्या बागेत मूग आणि उडीद यासारखी मिश्र पिके घेऊन एकाच वर्षात तीन हंगाम घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यामुळे जमिनीचा कस तर टिकतोच, शिवाय अतिरिक्त उत्पन्नही मिळत आहे.
बियाण्यांची चिंता मिटली; घरगुती वाणांवर भर
उन्हाळी सोयाबीनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली जाते. हे पीक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला हाती येते. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ताजे आणि दर्जेदार घरगुती बियाणे उपलब्ध होत आहे. कृषी केंद्रातून महागडी बियाणे खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या शेतातील बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
