Join us

Farmer Success Story : ३० गुंठ्यातून चार लाखांचे उत्पन्न; कोथिंबिरीच्या शेतीतून युवा शेतकऱ्याची 'आर्थिक क्रांती' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:13 IST

Farmer Success Story : पारंपरिक शेती सोडून नव्या विचारात उडी घेतल्यास यश नक्की मिळतं, हे परभणी जिल्ह्यातील तुषार देशमुख यांनी कोथिंबिरीच्या शेतीतून दाखवून दिलं. अवघ्या ३० गुंठ्यात त्यांनी ७५ क्विंटल उत्पादन घेत चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. सेंद्रिय शेतीचा अवलंब, नियोजनबद्ध पद्धत आणि बाजारभावाचा अचूक अंदाज हे त्यांच्या यशाचं गमक ठरलं. (Farmer Success Story)

अनिल जोशी

पारंपरिक शेती सोडून नव्या विचारात उडी घेतल्यास यश नक्की मिळतं, हे परभणी जिल्ह्यातील तुषार देशमुख यांनी कोथिंबिरीच्या शेतीतून दाखवून दिलं. अवघ्या ३० गुंठ्यात त्यांनी ७५ क्विंटल उत्पादन घेत चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. (Farmer Success Story)

सेंद्रिय शेतीचा अवलंब, नियोजनबद्ध पद्धत आणि बाजारभावाचा अचूक अंदाज हे त्यांच्या यशाचं गमक ठरलं.(Farmer Success Story)

पारंपरिक पिकांपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करून दाखवायची जिद्द असेल, तर शेतीतही नवी दिशा मिळवता येते, हे परभणी तालुक्यातील झरी येथील युवा शेतकरी तुषार सुरेशराव देशमुख यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

केवळ ३० गुंठ्यांमध्ये कोथिंबिरीची शेती करून त्यांनी अवघ्या ३ महिन्यांत तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

'कोथिंबीर' झाली आर्थिक आधार

शेतीसाठी हतबल वाटणाऱ्या वातावरणात तुषार देशमुख यांनी पारंपरिक पीक पद्धतीपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला.

२३ एप्रिल रोजी त्यांनी ३० गुंठ्यांत कोथिंबीर लागवड केली.

लागवडपूर्व नियोजन, शेणखताचा योग्य वापर, सिंचनाची काटेकोर आखणी आणि फवारणी व्यवस्थापनाने पिकाची जोमदार वाढ झाली.

मे महिन्यापासून कोथिंबीर निघण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ७५ क्विंटलहून अधिक उत्पादन घेतले आहे.

बाजारभावाचा अभ्यास, वेळेचे नियोजन आणि मेहनतीचा मोबदला

देशमुख यांनी कोथिंबीर थेट परभणी मार्केटमध्ये विक्री केली.

दररोज मजूरांच्या मदतीने कोथिंबीर काढली जाते आणि रात्रीच्या वेळी ती वाहतुकीसाठी सज्ज केली जाते.

४० ते ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत असून, आतापर्यंत मिळालेल्या एकूण विक्रीतून त्यांनी चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

सेंद्रिय शेतीवर भर

केवळ उत्पादन नव्हे, जमिनीच्या आरोग्याचीही काळजी

तुषार देशमुख हे फक्त नफा कमावणाऱ्या पिकांवर भर देत नाहीत, तर शेती टिकून राहावी यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे.

शेणखताचा वापर, मर्यादित फवारण्या, आणि मातीची गुणवत्ता टिकवणारे उपाय यामुळे त्यांची जमीन अधिक सुपीक राहिली आहे.

त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे.

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

आजच्या तरुण शेतकऱ्यांसमोर एक स्पष्ट संदेश आहे. शेतीत यश मिळवायचे असेल, तर स्मार्ट नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि सेंद्रिय दृष्टिकोन आवश्यक आहे. तुषार देशमुख यांच्या यशकथेमुळे अनेक तरुणांना शेतीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळू शकते.

उत्पादनाचा आढावा

तपशीलमाहिती

शेतीचा प्रकार

सेंद्रिय पद्धत
लागवड क्षेत्रफळ३० गुंठे
उत्पादन७५ क्विंटल कोथिंबीर
विक्री भाव४० ते ६० रु. प्रति किलो
मिळालेले उत्पन्न अंदाजे४,००,०००

पारंपरिक पिकांबरोबरच बाजारभावाचा अंदाज घेऊन भाजीपाला शेती करणे फायद्याचे ठरते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून दूर राहून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा.- तुषार देशमुख, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : 'कोकण बहाडोली'नं दिलं आर्थिक बळ; शेतकरी येळेकरांचं सेंद्रिय यश! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीभाज्या