भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेने बनावट सातबारा आणि खोटा पिकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्त सोयाबीन हमीभावात नाफेड केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामुळे शासनाची १ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाली असून, संस्थेच्या अध्यक्षासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघड होताच, इतर खरेदी केंद्रांचीही चौकशीची मागणी जोर धरत आहे.
भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावात नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर मोठा अपहार उघडकीस आला आहे.
बनावट सातबारा उतारे व खोटा पीकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्तीची सोयाबीन हमीभावात विकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे शासनाची १ कोटी २ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली असून, संस्थेच्या अध्यक्षासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा उघड झाला घोटाळा
आन्वा येथील वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र चालवत होती. या संस्थेविरोधात संग्रामसिंह राजपूत (रा. लिहा, ता. भोकरदन) यांनी महसूल व पणन विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
चौकशीदरम्यान समोर आले की, अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा न केलेला असतानाही, त्यांच्या सातबारा उताऱ्यांमध्ये खोटे पिकपेश दाखवून केंद्रावर हमीभावात सोयाबीन विक्री करण्यात आली.
तपासात उघड झाले हे वास्तव
संस्थेने एकूण २ हजार ६८० शेतकऱ्यांकडून ३९ हजार ३७९ क्विंटल सोयाबीन खरेदी केल्याचे नोंदवले होते. मात्र, प्राथमिक तपासणीत त्यापैकी २ हजार ९३ क्विंटल सोयाबीन खरेदी ही बनावट सातबाऱ्यांवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शासनाला अंदाजे १ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या फसवणुकीप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फिर्यादीवरून खालील १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत सुदाम दौड, सुनील शिवाजी शिंदे, अनिल शिवाजी घुले, सुरेश कैलास सोनवणे,रमेश ठकुबा गायकवाड, कृष्णा साईनाथ गायकवाड, गोपीनाथ कौतिक दौड़, सचिन भगतान दौड़, कृष्णा सुभाष आन्वेकर, पवन वाघ या सर्व आरोपींचे वास्तव्य जाणेफळ गायकवाड व वरूड बु (ता. भोकरदन) येथे आहे. या प्रकरणाचा तपास पारध पोलीस ठाण्याचे सपोनि एस. डी. माने करत आहेत.
आता इतर केंद्रांचाही पर्दाफाश होणार?
या प्रकारानंतर भोकरदन तालुक्यातील इतर सरकारी खरेदी केंद्रांवरील मका, ज्वारी, हरभरा, तूर आदी शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेबाबत शंका निर्माण झाली आहे. व्यापारी आणि संस्थाचालक केंद्रे संगनमताने अशा प्रकारचे घोटाळे करत असल्याची चर्चा आहे.
सखोल चौकशीचे आदेश, आणखी दोषींवर कारवाई शक्य
प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू केली असून, आणखी दोषींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.