E-Peek Pahani : कृषी कर्ज, सरकारी योजना व पीकविमा यासाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक नोंद अनिवार्य आहे. मात्र, ई-पीक पाहणी अॅप सतत डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. (E-Peek Pahani)
शेतकऱ्यांना वारंवार नोंदणीसाठी प्रयत्न करावा लागत असूनही सर्व्हर डाऊन किंवा कृपया थांबा असे संदेश मोबाईलवर दिसत आहेत. परिणामी शेतकरी वैतागले आहेत. (E-Peek Pahani)
सर्व्हर डाउनची अडचण
* राज्यात खरीप हंगामाला जूनमध्ये सुरुवात झाली, मात्र ई-पीक पाहणीला सरकारने तब्बल दोन महिने उशीर करून १ ऑगस्टपासून सुरुवात केली.
* ३ सप्टेंबरपासून अॅप कार्यान्वित झाले, परंतु, त्यानंतर सतत सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे.
* शेतकरी वारंवार लॉगिन करून पाहणी करण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रक्रिया पूर्ण होत नाही.
शेतकऱ्यांचा वैताग
सतत सर्व्हरशी संपर्क होत आहे. कृपया थांबा किंवा अॅप परत चालू करा असा संदेश शेतकऱ्यांना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोज-रोज महसूल कार्यालयात किंवा तलाठ्यांकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेकांना आपले पीक अद्याप नोंदवता आलेले नाही.
गैरप्रकाराचा आरोप
शेतकऱ्यांकडून असा आरोप होत आहे की, सर्व्हर डाऊन चे कारण सांगून काही ठिकाणी तलाठी शेतकऱ्यांना अडवतात.
नोंदणी प्रक्रियेत अनियमितता व गैरप्रकारही होत असल्याचे समोर येत आहे.
महसूल विभागाकडे देखील वणी तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली, याची अचूक माहिती नाही.
अंतिम मुदतीचा दबाव
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबरपर्यंत आहे.
सर्व्हर डाऊनची समस्या कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
परिणामी शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान आणि पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या योजना व लाभांपासून वंचित राहावे लागू शकते.
शेतकऱ्यांची मागणी
शेतकरी संघटनांनी सरकारकडे ई-पीक पाहणी अॅप व्यवस्थित चालेल याची तातडीने काळजी घेण्याची, तसेच सर्व्हर डाउनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
ई-पीक पाहणीच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची प्रचंड दमछाक होत असून, गैरप्रकारांचा फटका त्यांना बसत आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.