Join us

Dhan Bonus : सहा महिन्यांनी धान बोनस आला, आता चुकारे कधीपर्यंत मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:13 IST

Dhan Bonus : चुकारे थकल्याने खरीप हंगामासह (Kharif Season) शेतकऱ्यांचे इतर कामांचे नियोजन ढासळण्याची शक्यता आहे.

गोंदिया : शासनाने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनससाठी (Paddy Bonus) १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत तब्बल सहा महिन्यांनी दिलासा दिला. पण आता रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या तब्बल २४ हजार शेतकऱ्यांचे २४४ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. 

चुकारे थकल्याने खरीप हंगामासह (Kharif Season) शेतकऱ्यांचे इतर कामांचे नियोजन ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोनसने दिलासा, पण चुकाऱ्यांचे काय? असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्थकारण पूर्णपणे धानाच्या शेतीवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्धी हंगामात धानाची लागवड केली जाते. 

यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच शेतकऱ्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो. पीक कर्जाची परतफेड, मुला-मुलींचे लग्न, शिक्षणाचा खर्च, इतर खर्चाचे नियोजन अवलंबून असते. शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थचक्रच यावर अवलंबून आहे. पण या शेतकऱ्यांची कधी बोनस तर कधी चुकाऱ्यांसाठी कोंडी केली जाते. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस खचत चालला आहे. 

एक अडचण दूर केली, तर दुसरी होत असल्याने शेतकऱ्यांची स्थिती फारच बिकट झाली आहे. बोनसचा निधी मिळण्यास यंदा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागला. तर खरिपासाठी नातेवाईकांपुढे हात पसरावे लागले. तर दुसरीकडे रब्बीत विक्री केलेल्या धानाचे हक्काचे पैसेसुद्धा वेळेवर मिळाले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटाला तोंड देण्याची पाळी आली आहे. यातून कसेबसे सावरत असतानाच नैसर्गिक संकटाने तोंडचा घास हिरावून नेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पण यानंतरही खचून न जाता नव्या उमेदीने बळीराजा जोमाने खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे.

पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसानयंदा खासगी बाजारपेठेत धानाचे भाव पडले आहेत. तांदळाला मागणी नसल्याने धानाला सध्या प्रति क्विंटल १६०० ते १७०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना धान विकल्यास शेतकऱ्यांना क्विंटल मागे ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. एकंदरीत येथेही शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होत आहे.

उत्पादन अधिक मग उद्दिष्ट कमी कसेजिल्ह्यात रब्बी हंगामात ४६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. सुदैवाने धानाचे पीकसुद्धा चांगले आले. २० ते २५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मग शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट कसे दिले. नोंदणी केलेल्या ४६ हजार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २३ हजार शेतकऱ्यांनी १० लाख ६१ हजार क्विंटल धानाची विक्री केली आहे तर जवळपास अर्थ शेतकरी धानाची विक्री करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उत्पादन अधिक मग खरेदीचे उद्दिष्ट कमी कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड