- संजय तिपाले
Dhan Bonus : धान खरेदी, भरडाईतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची (Dhan Kharedi Ghotala) सध्या जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. रक्ताचे पाणी करून पिकवलेले धान गोदामात जागा नसल्याने वादळी-वारे, पावसात उघड्यावर ताडपत्रीच्या भरवशावर ठेवले जाते. खरेदीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केला जातो.
भरडाईच्या नावाखालीही घोटाळे केले जातात. कधी निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरण (Rice Market) प्रणालीद्वारे सामान्यांच्या माथी मारला जातो. एकीकडे व्यवस्थेतील उणिवांचा फायदा घेत गब्बर झालेले बोके तर दुसरीकडे लागवड ते विक्री या सर्व टप्प्यांवर वाट्याला हेळसांड येत असल्याने हतबल शेतकरी... हे चित्र कधी बदलणार? धान उत्पादकांना हक्काचा बोनस कधी भेटणार ?
धान शेती हे उत्पन्नाचे जिल्ह्यातील (Gadchiroli) प्रमुख स्रोत. बारमाही वाहणाऱ्या नद्या... सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान यामुळे येथील धा शेतशिवार गर्द हिरव्या जंगलाप्रमाणेच बहरलेले असते. जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये १ लाख ९० हजार हेक्टरवर धान लागवड झाली होती. यंदा २ लाख २० हजार हेक्टर एवढे अंदाजित लागवड क्षेत्र आहे. सध्या शेतकरी नोंदणीची लगबग सुरू आहे. ३१ मे पर्यंत नोंदणीची मुदत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या ५३ तर मार्केटिंग फेडरेशनच्या २३ आधारभूत हमीभाव खरेदी केंद्रांवर यंदा धान खरेदी करण्यात आले.
धान घोटाळेबाजांकडून वसुली होणार का ?कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये चार कोटींचा गैरव्यवहार केला. यावरून २१ एप्रिल रोजी उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणेंसह १७ जणांवर कुरखेडा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. पाठोपाठ थान भरडाई घोटाळ्याची चार प्रकरणे चव्हाट्यावर आली.
२ मे रोजी आरमोरीत जनता राईस मिल मालकावर, ३ मे रोजी देसाईगंजात अजय राईस मिल, सोनल पोहा उद्योग मिल व कुरुड येथील शारदा स्टिम प्रॉडक्ट येथे लाखोंचा गैरव्यवहार समोर आला. यातील बडे मासे अद्याप मोकाट आहेत. फौजदारी कारवाई झाली, पण गैर व्यवहाराच्या रक्कम वसुलीचे काय, हा प्रश्न आहे.
बोनसची घोषणा, आदेश पण पुढे काय ?महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादित २५ हजार रुपये हेक्टरी बोनसची घोषणा केली होती. हिवाळी अधिवेशनात दोन हेक्टरच्या मर्यादेत २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. त्याचा आदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निघाला, पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झालेला नाही.
खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे छदामही नाही. जिल्ह्यात ८८ हजार शेतकन्यांनी नोंदणी केलेली आहे, ते सर्व जण बोनसच्या प्रतीक्षेत हवालदिल आहेत.