Bhat Lagvad : महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात भात लागवड (Paddy farming) केली जाते. इतर पिकांपेक्षा भात लागवडीची एक वेगळीच परंपरा पाहायला मिळते. भात लागवडीला कुठे रोवणी म्हणतात, कुठे लावणी तर कुठं आवणी असेही म्हटलं जाते. सध्या भात लागवड अंतिम टप्य्यात असून शेतकरी लागवडीच्या लगबगीत आहेत.
भात लागवड हा शेतकरी वर्गाचा एक पारंपरिक सण उत्सव म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण भागात याचे चित्र आता वास्तव रूपी पाहता येते. पावसाळा सुरू झाला की भाताच्या आवणीला सुरुवात होते. महिला मजूर वर्ग सकाळपासूनच आवणीच्या (Bhat Avani) कामाला जातात. तेव्हा एकच हाक कानावर पडते, 'जाई-बाई, सई-बाई, करा आवणीची घाई..' असा सूर सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.
पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार तफावत दिसते. पण शेती करताना मात्र परंपरा न विसरता लोककला जोपासत आजही कथा, गीत व लोककला जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आवणी करणे म्हणजे शेतकर वर्गाचा एक उत्सवच असतो. रोवणी करताना धुरे-पारा मारणे, पुरुषांचे काम पन्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते.
मग ज्येष्ठ महिला मंडळी गाण्याच्या तालावर, रोमांचकारी राजा-राणीच्या पौराणिक, सामाजिक कथेच्या मांडणीद्वारे, हास्याचा कल्लोळ करणारे चुटकुले सादरीकरणातून रोवणी करतात. 'रोवा व बाई रोवणा रोवा, संध्याकाळी पाटलाच्या घरच्या घुगऱ्या खावा..' अशा पद्धतीने आवणी दरम्यान महिलांची गाणीही सादर होत असतात. आवणी हा आनंदाचा सोहळा मजूर वर्ग शेतात फुलवतात.
शेतकरी जपताहेत पंरपराग्रामीण भागात रोवणीचे चित्र आता थोडे बदलले, नांगराच्या ठिकाणी ट्रॅक्टर आले, शेणखताच्या ऐवजी रासायनिक खते आली, आठवडी मजुरी गेली आणि हुंडा काम करण्याची पद्धत आली, अशाप्रकारे काळानुसार बदल होत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण अनेक अडचणी, समस्यांचा सामना करीत आपले शेत राखतो, शेतात धानपिक लावतो, अशातच आवणी मजा काही वेगळीच असते.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यातील 'हा' साखर कारखाना विक्रीला काढला, विक्रीसाठीची निविदाप्रक्रिया सुरू