जळगाव : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यात तब्बल ७५ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांच्या बोगसगिरीचा प्रकार आतापर्यंत उघडकीस आला आहे.
प्रत्यक्ष शेतात केळीची बाग नसताना कागदोपत्री पीक दाखवून शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी १८ मार्चच्या रात्री जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ४२ सीएससी केंद्रांच्या चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यातील विमा क्षेत्राची पडताळणी केली असता, ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळी लागवडच झाली नसल्याचे समोर आले. तरीही २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर विमा उतरविला होता. यातून कोट्यवधी रुपयांचा विमा हप्ता आणि संभाव्य भरपाई हडपण्याचा मोठा कट रचला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी आयुक्तालयाने एकूण ४८ सीएससी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्यापैकी ४२ जणांवर आतापर्यंत कारवाई पूर्ण झाली असून, उर्वरित ६ चालकांवर देखील गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून 'लोकमत'ला देण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक 'मलिदा'
जिल्ह्यात सर्वाधिक घोटाळा चोपडा तालुक्यात झाला असून, येथे ३० कोटी ३० लाख रुपयांचा अपहार समोर आला आहे. अडावद पोलिस ठाण्यात ५ कोटी, चोपडा शहर पोलिस ठाण्यात २३ कोटी आणि चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात १ कोटी अशा एकूण ३० कोटींच्या फसवणूकप्रकरणी वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
यावलमध्ये क्षेत्र वाढवून दाखवले
यावल तालुक्यात २ हजार ४१ शेतकऱ्यांच्या शेतात केळी नसताना - पीक दाखवले गेले, तर १ हजार ९७५ शेतकऱ्यांच्या १ हजार ८९ हेक्टर - क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या फिर्यादीवरून ६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
