अमरावती : जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांना फळ पीकविमा (Pik Vima Yojana) मिळाला. मात्र अद्यापही अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फळ पिक विमा व खरीप पिक विमा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? असा सवाल या जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील (Amaravati district) शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये संत्रा पिक विम्यासाठी हेक्टरी 12 हजार रुपये आणि गारपीटीचे 1333 रुपये असे एकूण 13 हजार 333 रुपये फळ पिक विमा भरला. फक्त चांदूरबाजार तालुक्यातील चार महसूल मंडळ अचलपूर तालुक्यातील एक महसूल मंडळ व मोर्शी तालुक्यातील एक महसूल मंडळ यांना आंबिया बहाराचे (Ambiya Bahar Fal Pik Vima) फळ पिक विमा वाटप झाले.
दरम्यान अमरावती जिल्ह्यातील बाकीच्या महसूल मंडळात अजूनपर्यंत आंबिया बहार फळपीक विमा वाटप झाला नाही. संत्रा, केळी, मोसंबी फळ पिक उत्पादक शेतकऱ्यांनी 2024/25 मध्ये नवीन आंबिया बहार फळ पिक विमा काढण्यासाठी 2023 /24 च्या फळ पिक विमा परताव्या रक्कमेची वाट पाहिली. पण फळपीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही.
जानेवारी 2025 हे नवीन वर्ष लागून सुद्धा अजूनपर्यंत फळ पिक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. तसेच 2023 चा गारपीटीचा बहार फळ पिक विमा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याच महसूल मंडळात मिळालेला नाही. सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे, सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरात लवकर फळ पिक विमा मिळेल, या आशेवर शेतकरी डोळे लावून बसलेला आहे.
खरिपाचा पीक विमा देखील नाही
तसेच 2024-25 या वर्षीचा खरीप सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद या खरीप पिकाचा अजून पर्यंत शेतकऱ्याला पिक विमा परतावा मिळालां नाही. शेतकरी पिक विमा ऑफिस, तालुका कृषी कार्यालय, जिल्हा कृषी ऑफिस येथे निवेदन सादर करून चकरा मारत आहे. तरी राज्य सरकार व केंद्र सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून 2023 चा फळ पिक विमा तसेच 2024/ 25 चा खरीप पिक विमा शेतकऱ्या च्या खात्यात जमा करण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या शेतीच्या नियोजनासाठी या पिक विमा रकमेचा उपयोग करता येईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
पुणे येथील कृषी आयुक्तालयात संपर्क केला असता राज्य व केंद्र सरकार कडून आतापर्यंत रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच हिस्सा मिळाल्यानंतर परिपत्रक काढून तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावा, यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करत आहोत.
- पुष्पक श्रीरामजी खापरे, विमा शेतकरी प्रतिनिधी, अमरावती.