जळगाव : केंद्र सरकारने देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक आणि विशेष उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम सुरू केला असून स्थानिक उद्योजकतेला यातून प्रोत्साहन मिळण्यासह ग्रामीण रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यात जळगावच्या केळीचाही (Jalgaon Banana) समावेश करण्यात आला आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकास व्हावा, असा उद्देश एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) (ओ.डी.ओ.पी) उपक्रमाचा आहे.
तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यातून (एक जिल्हा एक उत्पादन) किमान एक उत्पादन निवडणे, त्याला ब्रॅंड करणे आणि त्याचा प्रचार करणे आहे. या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच जिल्ह्यांमधून उत्पादनांची निवड केली गेली आहे. संबंधित उत्पादनांचा त्यांच्या अद्वितीय गुणांसाठी आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून प्रचार केला जात आहे.
योजनेचा जिल्ह्याला लाभ किती झाला?सध्या जिल्ह्यात केळीचे लागवड क्षेत्र ५८ ते ६२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील केळी लागवडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. रावेर, यावल, चोपडा, जळगाव आणि जामनेर तालुक्यात केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे केळीचे पीक घेतले जात आहे. तसेच फळधारणेतही वाढ झाली आहे. देशभरातील नवीन संशोधनाचा अवलंब जिल्ह्यात सुरू झाल्याने केळी पिकाचा विस्तार वाढतच चालला आहे.
या पिकावरील प्रक्रिया उद्योग किती?केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातून कर्ज आणि अनुदान मिळवता येते. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पीएमएफएमई या योजनेतून ६४ आणि फक्त केळीवर प्रक्रियेसाठी २३ उद्योग सुरू करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत सद्यस्थितीला लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर या पिकावरील प्रक्रिया उद्योगांसाठी बँकांकरवी कोट्यवधींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. ओडीओपी उपक्रमाने देशभरातील ७६१ जिल्ह्यांमधून ११०२ उत्पादने निवडली आहेत.
'एक जिल्हा, एक उत्पादन' या योजनेंतर्गत केळीचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उत्पादकांना ही योजना नवतंत्रज्ञानातून कृषी विकास साधण्याची संधी निर्माण करीत आहे.- कुरबान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.