Agriculture News : गेल्या काही आठवड्यांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू होता. परिणामी शेतात पाणी साचून राहिल्यामुळे डवरणी, निंदण आणि फवारणीची कामे रखडली होती. (Agriculture News)
मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी ही रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा २.७० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून त्यात सर्वाधिक म्हणजे ५६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. (Agriculture News)
सततच्या पावसामुळे पिकांवर तण आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी कीटकनाशक आणि तणनाशक फवारणीला प्राधान्य देत आहेत.(Agriculture News)
फवारणी करताना घ्या काळजी
तज्ज्ञांच्या मते, फवारणी करताना योग्य सुरक्षा साहित्य वापरणे अत्यावश्यक आहे.
औषधांचे मिश्रण लाकडी काडीने नीट मिसळावे, फवारणी करताना मास्क, चष्मा, बूट व हातमोजे वापरावेत.
अनावधानाने औषध अंगावर उडाल्यास तात्काळ धुवावे. रिकाम्या औषधाच्या डब्याचा वापर पाण्यासाठी करू नये.
मजुरांची कमतरता नवा अडथळा
डवरणी, निंदण आणि फवारणी यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मात्र, सध्या मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मजुरीचे दरही वाढल्याने शेतीची आर्थिक गणिते बिघडत आहेत.
पावसाच्या नोंदी
जुलै महिन्यात जिल्ह्यात २११.१० मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मासिक सरासरीच्या तुलनेत ८६.७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रिसोड तालुक्यात सर्वाधिक १२० टक्के तर कारंजा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६३.१० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता शेतीशी संबंधित कामे करण्यास पुरेसा वेळ मिळत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या किटकनाशकांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. - सुरेश खोरणे प्रगतशील शेतकरी, चिखली