नाशिक : सततचा हवामान बदल (Climate Change), उशिरा आलेली रोपे आणि जानेवारीपासूनच वाढलेले तापमान यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik Onion Farmers) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचे (Unhal Kanda) उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी चार महिने सतत पडलेल्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाली, परिणामी लागवड लांबली. याचा परिणाम उत्पादनावर होणार असून, आधीच कमी झालेले उत्पादन वाढत्या तापमानामुळे (Temperature) अधिकच घटण्याची शक्यता आहे. कांद्याच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. मात्र, जानेवारीपासूनच उन्हाचा तीव्र प्रभाव वाढल्याने कांदा रोपांची वाढ थांबली आहे.
पर्यायी पिकेही तोट्यातकांदा पिकातून समाधानकारक उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू आणि भाजीपाला लागवड करण्याचा पर्याय निवडला. मात्र, गव्हाच्या उत्पादनातून ही अपेक्षित नफा होणार नाही. पाण्याची पातळी कमी झाल्याने इतर पिकांची लागवडही अडचणीत आली आहे.
केली दुबार पेरणीखराब झालेल्या कांद्याच्या रोपांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार रोपांची पेरणी करावी लागली. कांद्याच्या रोपांची किंमत प्रति पायली २५ हजार रुपये असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढला. दुबार पेरणीसाठी बियाण्यावर १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागला. यंदा जानेवारी महिन्यातच कडक उन्हाची सुरुवात झाल्याने कांदा पिकाची वाढ थांबली. थंडीचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे उत्पादनावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाढलेला उत्पादन खर्चबहुतांश शेतकरी दूध उत्पादनाच्या माध्यमातून अर्थकारण सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पन्न लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने विचार केला पाहिजे, अशी मागणी होत आहे. अन्यथा, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.