धुळे :धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री तालुक्यातील विटाई येथील प्रगतिशील शेतकरी निवृत्ती गुलाब हिरे व अर्चना हिरे यांची सुमारे चार एकर क्षेत्रात सीताफळ बाग आहे. या बागेसाठी त्यांनी मोठा आर्थिक खर्च केला. मात्र, चार वर्षांपासून ही बाग सांभाळत असतानादेखील अपेक्षित दर मिळत नसल्याने अखेर उभ्या बागेवर कुऱ्हाड फिरवण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.
निवृत्ती हिरे यांनी जून २०१८ मध्ये चार एकर क्षेत्रात एन. एम. के. १ गोल्डन जातीच्या संकरित सीताफळाची (Sitafal farming) बाराशे रोपांची लागवड केली. जमीन मध्य प्रतीची व मुरबाड होती, त्या कारणाने त्यांनी फळ शेती निवडली. बऱ्यापैकी उत्पन्नही हाती आले. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीतून अधिक उत्पन्न मिळेल, या आशेने हिरे कुटुंबातील सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
एकरी ७० हजार खर्च सीताफळ शेतीसाठी एकरी ६५ ते ७० हजार रुपये खर्च करावा लागतो. मात्र सध्याचे बाजारभाव पाहता सीताफळ विक्रीतून हा खर्च देखील मिळणे अवघड झाले आहे. त्यात मजुरी, वाहतूक खर्चाची अधिक भार येत असल्याने गेली सहा वर्षे जपलेल्या या सीताफळाच्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.
वाहतूक खर्च निघणेही अवघड
कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोगातून प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. यातून अनेक शेतकरी फळबाग शेतीकडे वळताना दिसून येतात. यात सीताफळ ही शेती कमी फवारणी, कमी मजुरी अशा कमी खर्चात होते. या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सीताफळ लागवड केली होती. मात्र, यात आधी अतिवृष्टीचा तर मागच्या वर्षी कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. यात यंदा अपेक्षित दरदेखील मिळत नसल्याने सीताफळाच्या या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे.