Join us

Kharif Perani : खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू; यंदा या दोन कडधान्य पिकांचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:34 IST

जमिनीत वापसा होईल तसा खरीप पेरणीला वेग येऊ लागला असून यंदा सोयाबीनचा जोर ओसरला आहे. सगळीकडे 'उडीद' पेरणीचा बोलबाला सुरू आहे.

सोलापूर : जमिनीत वापसा होईल तसा खरीपपेरणीला वेग येऊ लागला असून यंदा सोयाबीनचा जोर ओसरला आहे. सगळीकडे 'उडीद' पेरणीचा बोलबाला सुरू आहे.

रोहिण्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभरात दमदार पाऊस पडला तर दुसरा आठवडा पेरणीच्या नियोजनात गेला आहे. कधी नव्हे तो यंदा जिल्ह्यात १३ मे पासून पाऊस पडू लागला.

एखादा दिवस नव्हे, तर मे महिन्यात जिल्ह्यात तब्बल १७ दिवस पाऊस पडला आहे. कृषी विभागाला सुरुवातीला एवढ्या पावसाचा अंदाज आला नाही.

जून महिन्यात चांगला पाऊस पडला तर जूनअखेरला खरीप पेरणीला सुरुवात केली जाते. जुलै महिन्यात उडीद, मूग, सोयाबीन, तूर व बाजरीची पेरणी जोमात सुरू असते, तर ऑगस्ट महिन्यात मका, तूर, सोयाबीन पेरणी होते.

यंदा पाऊस फारच लवकर व दमदार पडल्याने पेरणीचे गणित बदलले आहे. एकीकडे कृषी खात्याचे खरीप पेरणीची घाई करू नका, असे आवाहन, तर दुसरीकडे पेरणीसाठी पुरेशी ओल झाल्याने शेतकरी मातीत बियाणे टाकून मोकळे होऊ लागले आहेत.

मागील वर्षी जिकडे-तिकडे सोयाबीन, तर यंदा सगळीकडे उडीद दिसत आहे. मृग नक्षत्राची सुरुवात रविवारी सकाळी सात वाजता होणार आहे. सुरुवातीचे तीन-चार दिवस पाऊस कमी मात्र १३ जूनपासून आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

यंदा तूर, उडीद क्षेत्र वाढतेय- हमीभावाने खरेदी होणारे व चांगला दर मिळत असल्याने तूर व उडीद पीक प्राधान्याने घेतले जात आहे.- जिल्ह्याचे खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ९० हजार हेक्टर असले तरी मागील वर्षी चार लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरा झाला होता.- यंदा पाच लाख सहा हजार हेक्टर क्षेत्र खरिपाने व्यापेल असा अंदाज कृषी खात्याचा आहे.- शिवाय पाऊस वेळेअगोदर पडल्याने अंदाजापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होईल. मात्र, पेरणीसाठी पावसाने उसंत देण्याची गरज आहे.- जून महिन्यात शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिली तर जुलै महिन्यात खरीप पेरणी होणार आहे.

आता बैलजोड्या कमी झाल्याने सर्रास ट्रॅक्टरच्या साहाय्याने खरीप पेरणी केली जात आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे व उडीद क्षेत्र अपेक्षेपेक्षा वाढेल असे दिसत आहे. सोयाबीन पेरणी होईल मात्र क्षेत्र कमी असेल. जमिनीची मशागत झालेली नसेल तर उगवण क्षमतेवर परिणाम दिसेल. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

यंदा चांगला व वेळेवर पाऊस पडल्याने खरीप हंगामात शेतकरी उडीद व तूर, मका बियाण्याची खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांनी ठराविकच बियाणे खरेदीचा आग्रह धरू नये. सर्वच बियाणे क्वालिफाईड आहे. दुकानदारांनी दर्जेदार बियाण्यांची विक्री करावी. यात हयगय झाल्यास कायदेशीर कारवाई करू. - देवराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

अधिक वाचा: राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर

टॅग्स :पेरणीशेतकरीशेतीसोलापूरखरीपतूर