Join us

Kharif Perani : पेरणीची घाई ठरू शकते धोक्याची; ओढवू शकते दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:23 IST

यंदा मान्सूनपूर्व पाऊस धो-धो बरसला. पुढे पाऊस होईल या आशेवर मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी आणि सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांच्या पेरण्या केल्या.

पाचेगाव : यंदा मान्सूनपूर्व पाऊस धो-धो बरसला. पुढे पाऊस होईल या आशेवर मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी आणि सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांच्या पेरण्या केल्या.

मात्र, जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची दुबार पेरीची चिंता वाढायला लागली आहे.

नेवासा तालुक्यात ज्या बागायती पट्टयात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी कपाशीच्या पन्नास टक्के लागवडी उरकल्या आहेत. तसेच पाच टक्के क्षेत्रावर सोयाबीन, मूग, तूर, आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे.

तालुक्यात खरिपाचे अंदाजित लागवड क्षेत्र ५५ हजार हेक्टर असून, त्यापैकी ४२ टक्के क्षेत्रावर एकट्या कपाशी पिकाची लागवड केली जाते. त्याखालोखाल सोयाबीन, तुरीचा पेरा केला जातो.

कृषी विभागाने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा खंड राहणार असल्याची सूचना दिली होती. सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांच्या पेरणीचा हंगाम हा १५ जून ते १५ जुलै असून, शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्यांची घाई करू नये असे आवाहनही कृषी विभागाने केले होते.

मात्र, कृषी विभागाच्या या आवाहनाकडे अनेक शेतकऱ्यांनी कानाडोळा करीत सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली.

आता पाऊस लांबल्याने पिकांना पाणी कोठून द्यायचे? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागला आहे. दरम्यान जिल्ह्यातील बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

यावर्षी शेतकरी कपाशी ऐवजी तूर, सोयाबिन, मूग अशा पिकांना पसंती देत आहेत. मात्र नेवासा तालुक्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

पेरणीची लगीनघाई अन् दुबारचे संकटतालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लगीनघाईने खरीप पिकांची पेरणी केली. आता पाऊस लांबला आहे. उन्हाचा पारा वाढलेला असून, कोवळी पिके पाण्यावर आलेली आहे. अशातच पाऊस किती दिवस लांबतो यावर दुबार पेरणीचे गणित अवलंबून आहे.

शेतकऱ्यांना जाणवतोय खतांचा तुटवडातालुक्यात खतांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरीप हंगामासाठी खतांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या यूरिया, डीएपी आणि काही मिश्र खतांचा तुटवडा जाणवत आहे. खतांची लिंकिंग मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने कृषी सेवा केंद्र चालकांना लिंकिंगशिवाय खते देण्यास कंपन्यांनी नकार दिल्याने कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; १३ जूनपासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार

टॅग्स :पेरणीशेतीशेतकरीपीकखरीपपाऊसमोसमी पाऊससोयाबीनकापूस