Join us

जवाहर रोजगार योजनेची विहीरच गेली चोरीला; डांगसौंदाणे येथील प्रकाराने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:22 IST

सन २००९-२०१० या वर्षात डांगसौंदाणे येथे जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासन अनुदान असलेली खोदकाम करून बांधकाम केलेली विहीर चक्क चोरीला गेल्याची तक्रार गट नंबर ८७/२ मधील शेतकऱ्याने केली.

सन २००९-२०१० या वर्षात डांगसौंदाणे येथे जवाहर रोजगार योजनेंतर्गत शासन अनुदान असलेली खोदकाम करून बांधकाम केलेली विहीर चक्क चोरीला गेल्याची तक्रार गट नंबर ८७/२ मधील शेतकऱ्याने केली.

नाशिक जिल्ह्याच्या डांगसौंदाणे (ता. सटाणा) येथील शेतकरी स्व. शशिकांत चंद्रात्रे (कुलकर्णी) यांच्या सातवड पांधी येथील मालकीच्या गट नंबर ८७/२ क्षेत्रात कृषी अधिकारी यांच्याकडील पात्रता यादीनुसार व जिल्हा निवड समिती यादी क्रमांक ८० नुसार जवाहर रोजगार योजनेंतर्गत अनुदानातून विहीर मंजूर केली होती.

तत्कालीन गटविकास अधिकारी, उपअभियंता ल. पा. उपविभाग पंचायत समितीच्या माध्यमातून विहीर खोदकाम करण्याचा प्रशासकीय मंजुरी आदेश दि. ३० जानेवारी २००९ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी काढला होता.

त्यानुसार २००९-१० मध्ये विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गट नंबर ८७/२ मधील जवाहर योजनेची विहीर नोंद करण्यासाठी जि.प. लपा उपविभाग, सटाणा यांनी तलाठी डांगसौंदाणे यांना २०१० मध्ये आदेश दिले होते. त्यानुसार ८७/२ सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यात आली. मात्र, आता तब्बल १६ वर्षांनी या गटातील विहीरच चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

तक्रारीनंतर नोटिसा...

विहीर चोरीस गेल्याप्रकरणी शासनस्तरावरून सहा संशयितां विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवावेत, यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. ८८ गटातील शेतकऱ्याने सातवड पांधी येथील गट नंबर ८७/२ ही शेती बळकावण्यासाठी हा प्रताप केल्याचे उघडकीस येत असल्याचे समजते. तक्रार झाल्यानंतर गुन्हे नोंदविण्यासाठी बागलाण तहसीलदारांनी नोटिसा बजावून सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचा : शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनाशिकसरकारी योजना