Join us

अनुदानाची योजना खोटी? शेतकऱ्यांना मिळाले किडके बियाणे पेरणीसाठी; वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 18:02 IST

कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणे ताब्यात घेताना हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची शनिवारी चांगलीच दमछाक झाली. कागदपत्रांच्या तपासणीच्या घोळात चार तास शेतकऱ्यांना तिष्ठत बसावे लागले. विशेष म्हणजे अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितले, तर बियाणे निकृष्ट असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला.

आयुब मुल्ला 

कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणे ताब्यात घेताना कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची शनिवारी चांगलीच दमछाक झाली. कागदपत्रांच्या तपासणीच्या घोळात चार तास शेतकऱ्यांना तिष्ठत बसावे लागले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर शेतकऱ्यांची वादावादी झाली. विशेष म्हणजे अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितले, तर बियाणे निकृष्ट असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी थेट तक्रार करून असे बियाणे आमच्या माथी कशासाठी मारता, पेरणीची घात संपत चालली आहे, बियाणे वेळेत मिळत नाही, यातून कृषी विभागाला काय साध्य करायचे आहे, असा सवाल केला.

खरीप हंगामात कृषी विभागाने प्रात्यक्षिक व प्रमाणित असे सोयाबीन व भुईमुगाच्या बियाणाचे वाटप करण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले, याची मुदत चारवेळा वाढविली. या पद्धतीचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला.

नोंदणी होऊनही निवड व प्रतीक्षा यादीत नाव येण्यास दोन आठवडे वाट पाहावी लागली. त्यानंतर सोयाबीनचे वाटप सुरू झाले; परंतु भुईमूग बियाणे मात्र तीन आठवडे झाले आलेच नाही. एकीकडे वाट पाहत बसण्याची वेळ अन् दुसरीकडे पेरणीस विलंब होत असल्याची हुरहुर यामुळे शेतकरी संभ्रमात पडला होता. 

अखेर हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव व हुपरी येथून भुईमुगाच्या बियांचे वाटप शनिवारपासून सुरू झाले. या केंद्रावर संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी वाटप प्रक्रियेत सहभागी होते. पेठ, वडगाव व हातकणंगले मंडळ विभागातील ४२ गावांतील शेतकरी बियाणे नेण्यासाठी आले होते. त्या सर्वाना कागदपत्रांच्या छाननीचा नाहक त्रास सहन करावा लागला.

सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, फार्मर आयडी ही कागदपत्रे व ज्यांच्या उताऱ्यावर सामायिक नावे आहेत त्यांचे संमतीपत्र तिकीट लावून द्यावे लागत होते. त्यातच ज्यांना निवड झाल्याचा संदेश आला होता त्यांचे नाव निवड यादीत नसल्याचे समोर आले.

त्यामुळे पुन्हा कृषी विभागाचे पत्र घ्यावे लागत होते. याच्या तपासणीसाठी विलंब होत गेला. त्यात खराब बियाणे मिळाल्याने शेतकऱ्यांची चेष्टा चालवलाय काय? असाच सूर व्यक्त झाला. एकूणच कृषी विभागाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

२४ टनच बियाणे उपलब्ध

• हातकणंगले तालुक्यात ४९० हेक्टरसाठी ४९ टन भुईमुगाचे बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ६५३ शेतकऱ्यांची निवड केली.

• प्रत्यक्षात मात्र आज २४ टनच बियाणे उपलब्ध झाले होते. पेठवडगाव येथील केंद्रावर ४४५ शेतकऱ्यांसाठी आठ टन व हुपरी येथील केंद्रावर १६ टन बियाणे उपलब्ध होते.

दिवसभर रांगेत उभा राहून वियाण्यांची पोती ताब्यात घेतली. उघडून बघितले तर निकृष्ट बियाणे असल्याचे दिसून आले. पोकळ, किडक्या शेंगा, त्यातील बी तर एकदम लहान होते. याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी तक्रार अर्ज द्या, असे सांगितले. - नितीन पाटील, शेतकरी, अंबप.

मुळातच बियाणे उशिरा आले. बियाणे वाटपाचा शनिवार पहिला दिवस होता. त्यामुळे गर्दी झाली. बियाण्यांचे वाटप व्यवस्थित होण्यासाठी कागदपत्रांची तपासणी महत्त्वाची होती. त्यामुळे वेळ लागत होता. सर्व निवड झालेल्या शेतकऱ्यांना वाटप करून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. - नंदकुमार मिसाळ, मंडळ कृषी अधिकारी, पेठवडगाव.

हेही वाचा :  जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

टॅग्स :कोल्हापूरशेती क्षेत्रशेतकरीशेतीखरीपसरकार