नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वृद्धी केली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजर बियाणे) (प्रति क्विंटल ८२० रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) करण्याची शिफारस केली आहे.
२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी सर्व खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (प्रति क्विंटल रुपये)
अ.क्र. | शेतमाल | किमान आधारभूत किंमत (२०२५-२६) | किमान आधारभूत किंमत (२०२४-२५) | वाढ |
१ | भात (सामान्य) | २३६९ | २३०० | ६९ |
भात (ग्रेड अ) | २३८९ | २३२० | ६९ | |
२ | ज्वारी (हायब्रिड) | ३६९९ | ३३७१ | ३२८ |
ज्वारी (मालदांडी) | ३७४९ | ३४२१ | ३२८ | |
३ | बाजरी | २७७५ | २६२५ | १५० |
४ | नाचणी | ४८८६ | ४२९० | ५९६ |
५ | मका | २४०० | २२२५ | १७५ |
६ | तूर | ८००० | ७५५० | ४५० |
७ | मूग | ८७६८ | ८६८२ | ८६ |
८ | उडीद | ७८०० | ७४०० | ४०० |
९ | भुईमूग | ७२६३ | ६७८३ | ४८० |
१० | सूर्यफूल (बियाणे) | ७७२१ | ७२८० | ४४१ |
११ | सोयाबीन पिवळा | ५३२८ | ४८९२ | ४३६ |
१२ | तीळ | ९८४६ | ९२६७ | ५७९ |
१३ | कारळे | ९५३७ | ८७१७ | ८२० |
१४ | कापूस (मध्यम स्टेपल) | ७७१० | ७१२१ | ५८९ |
कापूस (लांब स्टेपल) | ८११० | ७५२१ | ५८९ |
२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केलेली ही वाढ २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट किमान आधारभूत किमती निश्चित करण्याच्या घोषणेशी सुसंगत आहे.
बाजरी (६३%) आणि त्यानंतर मका (५९%), तूर (५९%) आणि उडीद (५३%) या पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५०% जास्त नफा मिळण्याचा अंदाज आहे.
अलिकडच्या वर्षांत सरकार डाळी तसेच तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्रीअन्न यासारख्या धान्यांव्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला या पिकांसाठी जास्त किमान आधारभूत किमती देऊ करुन प्रोत्साहनही देत आहे.
तर २०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत ७६०८ लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली, तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत केवळ ४५९० लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली होती. याशिवाय २०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत १४ खरीप पिकांची ७१७८ लाख मेट्रिक टन खरेदी झाली तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ४६७९ लाख मेट्रिक टन धानाची खरेदी झाली होती.
२०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या रुपात १४.१६ लाख कोटी रुपये देण्यात आले तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या रुपात ४.४४ लाख कोटी रुपये देण्यात आले होते.
२०१४-१५ ते २०२४-२५ या कालावधीत १४ प्रकारची खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत १६.३५ लाख कोटी रुपये होती. तर २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत, शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत ४.७५ लाख कोटी रुपये होती इतकी होती.