बालाजी बिराजदार
खरीप २०२४ मधील पीक काढणी कव्हर अंतर्गत पीक विमा, नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या ७५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पीक विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार १६७ अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. दरम्यान, याच वर्षात जिल्ह्यात अतिवृष्टी, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर कंपनीने सर्वेक्षण करून पाच लाख १९ हजार ७५७अर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत २१८ कोटी ८ लाख रुपयांचे वाटप केलेले आहे.
तसेच सात हजार ६९९ शेतकऱ्यांची पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम एक हजारपेक्षा कमी असल्याने राज्य शासनाकडून सबसिडी आल्यानंतर त्याचेही वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम १ कोटी २५ लाख इतकी आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या ३० एप्रिल २०२४च्या परिपत्रकानुसार १०० रुपये नुकसान झाले तरी केवळ २५ रुपयेच नुकसान देण्याची सूत्र निश्चित केले गेले आहे.
यानुसार पीककाढणी कव्हर अंतर्गत जवळपास ४५ हजार शेतकऱ्यांना, तर वैयक्तिक पूर्वसूचनेच्या आधारे काढणी कव्हरअंतर्गत ३० हजार अशा एकूण ७५ हजार शेतकऱ्यांची अद्याप जवळपास १२ कोटी रुपये येणेबाकी असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
तालुकानिहाय मिळालेली नुकसान भरपाई
भूम - १७ कोटी १ लाखधाराशिव - ५० कोटी ५५ लाखकळंब - ३६ कोटी २८ लाखलोहारा - १७ कोटीपरंडा - ८ कोटी ५६ लाखतुळजापूर - ४५ कोटी ५९ लाखउमरगा - २५ कोटी ९६ लाखवाशी - १७ कोटी ७२ लाखएकूण - २१८ कोटी ८ लाख
पोस्ट हार्वेस्टिंग अर्थात पीककाढणी कव्हरअंतर्गत जिल्ह्यातील ७५ हजार शेतकऱ्यांची जवळपास १२ कोटी रुपये रक्कम मिळणे बाकी आहे. पीक विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार ५९६ कोटींपैकी राज्य शासनाकडून अद्याप २१३ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे सदरील रकमेचे शेतकऱ्यांना वाटप झाले नाही. राज्य शासनाने दुसरा हप्ता कंपनीला दिल्याचे समजते. त्यामुळे कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई देऊन पेरणीसाठी आर्थिक दिलासा द्यावा. - अनिल जगताप, सामाजिक कार्यकर्ते.