कोल्हापूर : आशिया खंडात एकेकाळी नावलौकिक मिळवलेला शेतकरी सहकारी संघाचा 'बैल' हळूहळू कात टाकतोय. संपलेल्या आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत २४ कोटींची वाढ झाली असून पहिल्यांदाच ६४ पैकी ६० शाखा नफ्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संघ तोट्यातून ६० लाखांनी नफ्यात आला आहे.
पी.ए. राणे, तात्यासाहेब कोरे व बाबा नेसरीकर यांनी उभा केलेल्या शेतकरी संघाने संपूर्ण आशिया खंडात सहकारात दबदबा निर्माण केला होता. पण, गेल्या २५ वर्षापासून संघाला आर्थिक घरघर लागली आणि २००१ ला संघ १ कोटी ७१ लाख ४७ हजार रुपयांनी तोट्यात गेला. त्यानंतर, अनेकांनी संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले, पण
बाजारातील स्पर्धा आणि संघाचे नियोजन यामध्ये एकसंधपणा कधी राहिलाच नाही. त्याचबरोबर काही संचालक मंडळाने चुकीचा कारभार केल्याने बरखास्त करून प्रशासकीय कारकीर्दही संघाने अनुभवली आहे. सव्वा दोन वर्षापूर्वी संघाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकत्र आले खरे पण पहिल्या वर्षी अपेक्षित कारभार न झाल्याने मागील (२०२४-२५) या आर्थिक वर्षात संघाला ८५ लाख ९३ हजार रुपयांचा तोटा झाला.
पण, गेल्या वर्षभरापासून सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी नेटाने काम केल्याने संघाच्या बैलाच्या अंगात काहीसी ताकद आल्याचे चित्र पहावयास मिळते. गेल्या आर्थिक वर्षात ६४ पैकी ३४ शाखा तोट्यात होत्या, मात्र मार्च अखेर तब्बल ६० शाखा नफ्यात आल्या आहेत.
४.६७ कोटींचा संचित तोटा कमी करण्याचे आव्हान
• यापूर्वी संघाला ४ कोटी ६७ लाख १ रुपये संचित तोटा आहे. यंदाचा ६० लाख नफा संचित तोट्याला वर्ग करावा लागणार आहे.
• तरीही ४ कोटी ७ लाख रुपयांचा तोटा अजून शिल्लक आहे. हा तोटा कमी करण्याचे खरे आव्हान संचालक मंडळासमोर राहणार आहे.
संपलेल्या आर्थिक वर्षाची उलाढाल..
• संपलेल्या आर्थिक वर्षात संघाच्या उलाढालीत २४ कोटींची वाढ झाली.
• पहिल्यांदाच ६४ पैकी ६० शाखा नफ्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संघ तोट्यातून ६० लाखांच्या नफ्यात आला आहे.
सगळ्यांनी हातात हात घालून काम केल्यानेच शाखा नफ्यात येऊ शकल्या. ही खरेदी-विक्री संस्था आहे, इतर संस्थांपेक्षा कामकाज वेगळे असल्याने ती दृष्टी ठेवून काम केले तर संचित तोटा कमी करण्यास फार वेळ लागणार नाही. - प्रा. बाबासाहेब शिंदे, अध्यक्ष, शेतकरी संघ.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : The Shetkari Sangh, once renowned, is recovering. Turnover increased by ₹24 crore, with 60 of 64 branches profitable. After years of losses, the Sangh is now ₹60 lakh in profit, though ₹4.07 crore accumulated loss remains.
Web Summary : कभी प्रसिद्ध शेतकरी संघ अब उबर रहा है। कारोबार में 24 करोड़ रुपये की वृद्धि हुई, 64 में से 60 शाखाएँ लाभ में हैं। वर्षों के नुकसान के बाद, संघ अब 60 लाख रुपये के लाभ में है, हालांकि 4.07 करोड़ रुपये का संचित नुकसान अभी भी बाकी है।