गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
त्यासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर 'अपलोड' करण्याचे काम शुक्रवार, २१ मार्चपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांत सुरू करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत ५६ हजार ७०० शेतकऱ्यांचे ५७ हजार ३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तसेच, जमीन खरडून व गेल्याने ४८ शेतकऱ्यांचे ३० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले होते.
या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या महसूल वनविभागामार्फत १८ मार्च रोजी जारी करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत देण्यासाठी ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदत मंजूर करण्यात आली आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयांत सुरू करण्यात आले आहे. - अजित कुंभार, जिल्हाधिकारी अकोला.